
हिंगोली ः मराठवाडा विदर्भाच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील (Painganga River) सात उच्च पातळी बंधाऱ्यांना सोमवारी (ता. ९) राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. हे बंधारे (Bunds) पूर्ण झाल्यानंतर १० हजार ६०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, अशी माहिती हिंगोली लोकसभा मतदारल संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली.
खासदार पाटील म्हणाले, की या बंधाऱ्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पैनगंगा नदी ही हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांची जीवन वाहिनी आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर आणि पुसद तालुक्यांतील शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा मोठा लाभ होणार आहे.
या नदीवरील इसापूर धरणाने शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागविली आहे. परंतु अनेक कालवे नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही. त्यामुळे पैनगंगा कयाधू नदी खोऱ्यातील सिंचनाची तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उच्च बंधारे पूर्णत्वास आल्यास आजूबाजूच्या १० हजार ६०० हेक्टर जमीन ओलिताखाली येईल.
त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. या सात बंधाऱ्याच्या मध्यवर्ती ठिकाणावरून परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचे समान वाटप होईल, यासाठी बेल मंडळ आणि कुर्तडी येथे वितरिका (कॅनॉल) निर्माण करण्याच्या कामासाठी सर्वे करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शेतीच्या पाणीवाटपात कुठल्याही शेतकऱ्यांसोबत दुजाभाव होणार नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.