
सिंधुदुर्गनगरी ः फळगळीमुळे (Areca Nut Fruit Fall) जिल्ह्यातील सुपारी बागायतदार संकटात सापडले आहेत. अर्धवट परिपक्व स्थितीतील फळे गळून (Fruit Fall) पडत असल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अवकाळी पावसाचा हा परिणाम मानला जात आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात आंबा, काजू, नारळ या पिकांसोबतच सुपारीची मोठी लागवड आहे. तांबोळी, असनिये, कोनशी, वाफोली, नेतर्डे, झोळंबे, डिंगणे, गाळेल, वाफोली, ओटवणे, माडखोल, बांदा यांसह अन्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारीची लागवड आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे सुपारीवर बुरशीचा प्रादुर्भाव जाणविण्यास सुरुवात झाली.
परिपक्व होण्याच्या स्थितीतील फळांची गळ होण्यास सुरुवात झाली. फवारण्यानंतर देखील गळ थांबलेली नाही. ७० टक्के फळांची गळ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या वर्षीदेखील सुपारीवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, सुपारीचा समावेश फळपिकात नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदतदेखील मिळत नाही.
सुपारी हे कोकणातील महत्त्वाचे फळपीक आहे. परंतु त्याचा समावेश फळपिकांमध्ये नाही. या पिकांवर कोकणातील हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. सुपारीला मोठी बाजारपेठदेखील गोव्यासह विविध भागांत आहे.
परंतु गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पावसाचा फटका या पिकाला बसत आहे. या वर्षी देखील फळगळीमुळे आमचे ७० टक्के नुकसान झाले आहे. परंतु कोणतीही भरपाई आम्हाला मिळणार नाही. त्यामुळे या पिकाचा समावेश फळपिकांत करावा.
- शैलेश लाड, सुपारी बागायतदार, नेतर्डे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.