
ॲग्रोवन वृत्तसेवा
रत्नागिरी ः गेले काही दिवस पारा ३९ अंशापर्यंत पोचला होता. त्यामुळे हवेत प्रचंड उष्मा होता. हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तविली होती.
त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात काही भागांमध्ये मंगळवारी (ता. ७) सकाळी ढगाळ वातावरण होते. वेगवान वारेही वाहत होते. ढगाळ वातावरणामुळे हापूसवर (mango) किटकांचा प्रादुर्भाव (Pest attack) होऊ नये यासाठी किटकनाशकांसह बुरशीनाशकांची फवारणी करावी लागणार आहे.
होळी उभी राहिल्यानंतर पावसाचा शिडकावा होतो अशी परंपरा सांगितली जाते. त्यानुसार यंदा शिमगोत्सवात पावसाळी वातावरण तयार झाले होते.
पहाटेच्या सुमारास वेगवान वारेही सुटले होते. पाऊस पडणार अशीच स्थिती होती; मात्र कालांतराने कडकडीत उन पडले. ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा पिकावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात मोहोरच आलेला नसल्याने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात अपेक्षित हापूस उत्पादन मिळणार नाही. कडकडीत उन्हामुळे १५ मार्चनंतर फळ तयार होण्यास सुरवात होईल.
गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्ह्यातून वाशी बाजारात हजार पेट्या रवाना होत आहेत. मागील पाच वर्षाच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे झाडावरील फळ वेगाने तयार होत आहेत. आजच्या ढगाळ वातावरणामुळे फवारणीचा खर्च बागायतदारांना होणार आहे.
या बाबत रत्नागिरी तालुक्यातील आंबा बागायतदार राजेंद्र कदम म्हणाले, यंदा ज्या बागायतदारांनी कीटकनाशकांची योग्य फवारणी केली आहे, त्यांच्याकडे आंबा चांगला राहील.
पुढील आठ दिवसात पावसाची शक्यता असल्याने बागायतदारांना काळजी घ्यावी लागणार आहे. पाऊस पडला तर शेवटच्या टप्प्यातील मोहोरावर बुरशी वाढू शकते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.