
वाशीम : जिल्ह्यात चालू वर्षात चांगला पाऊस झाल्यामुळे मुबलक प्रमाणात जलसाठा (Water Storage) निर्माण झाला. तसेच जमिनीत ओलावा (Soil Moisture) असल्यामुळे रब्बी हंगामात हरभऱ्याची अधिक क्षेत्रावर पेरणी (Chana Sowing) झाली. या पिकाला अतिरिक्त ओलीत टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
चांगली परिस्थिती असल्याने जिल्ह्यात हरभऱ्याची सुमारे ८० हजार हेक्टरपर्यंत लागवड पोहोचली आहे. सरासरी क्षेत्राच्या १३ टक्के अधिक पेरणी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये पेरणी केलेले पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. उशिरा पेरणी केलेले पीक काही ठिकाणी वाढीच्या, तर कुठे फुलोरावस्थेत आहे
हरभरा पिकास साधारणतः २५ सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते. हरभरा पिकास जास्त पाणी दिल्यामुळे मूळ सडून पीक उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे हरभरा पिकास पाणी देताना जमिनीचा मगदूर पाहून पाण्याचे नियोजन करावे.
हरभरा हे मुख्यत्वे कोरडवाहू पिकामध्ये मोडते. थंडीचा कालावधी या पिकास अतिशय पोषक असतो. अशावेळी पिकांच्या अवस्थेनुसार हरभरा पिकास जास्तीत जास्त तीनच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
पिकास तुषार संचाद्वारे पाणी देत असताना पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
जमिनीत नेहमी वापसा परिस्थिती राहिल्यास पिकाची वाढ चांगली होते. फुलांवर येण्यापूर्वी, फुलावर आल्यानंतर व घाट्यामध्ये दाणे भरण्याचे अवस्थेत पाणी द्यावे.
जास्तीचे पाणी या पिकास दिल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतोवर हरभरा पिकास अतिरिक्त पाणी देऊ नये, असेही श्री. तोटावार यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.