
Jalgaon News : खानदेशात मागील तीन-चार दिवसांच्या उष्ण लाटेत निसवलेल्या आणि तीन ते चार महिन्यांच्या केळी बागा होरपळल्या आहेत. मुबलक पाणी देऊन किंवा सिंचन करूनही बांधानजीक आणि पश्चिम व दक्षिण बाजूकडे बागांत मोठी हानी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सुमारे नऊ हजार हेक्टरवरील दोन ते तीन महिने कालावधीच्या केळी बागांची पाने पोळली आहेत. तर १५ हजार हेक्टरवरील निसवलेल्या बागांमध्ये घड सटकणे, झाडे मोडून पडणे अशी स्थिती आहे.
रोज पाच ते सहा तास सिंचन करूनही बांधावरील किंवा पश्चिम आणि दक्षिण बाजूकडील केळी झाडांची अतोनात हानी झाली आहे. झाडे पिवळी पडली आहेत. त्यावरील घडही पिवळे - काळे पडून १०० टक्के नुकसान झाले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी वारा अवरोधक म्हणून संकरित मोठे गवत, हिरव्या नेट लावल्या आहेत, तेथील बागांचा काहीसा बचाव होत आहे. परंतु उष्ण वाऱ्यांमुळे या बागांमध्येही १० ते १५ टक्के हानी होत आहे.
निसवलेल्या बागा सध्या जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा या भागांत आहेत.
एक हजार झाडांमध्ये रोज पाच ते सात झाडांचे घड सटकून नुकसान होत आहे. खानदेशात मागील तीन दिवस कमाल तापमान ४४.५ अंश सेल्सिअसवर राहिले आहे.
पावसानंतर अचानक उष्णतेत वाढ
खानदेशात या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत ढगाळ, पावसाळी वातावरण होते. परंतु १० मेपासून उष्णता वाढू लागली. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत असायचे.
परंतु ढगाळ वातावरण निवळल्याने उष्ण वारेही आले आणि तापमानात मोठी वाढ झाली. परिणामी, लहान व मोठ्या बागांनाही बाधा झाली आहे.
यातच ज्या बागांत ४ ते ५ मेपर्यंत कलिंगडाचे आंतरपीक व पॉली मल्चिंग होते, अशा बागांना अधिकची झळ पोचली आहे. या बागांची कोवळी पाने पूर्णतः खराब झाली आहेत. त्यात २० ते २५ टक्के नुकसान आजघडीला दिसत आहे.
लागवडीचे नियोजन कोलमडले
खानदेशात आगाप मृग बागांची लागवड मेच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. अनेकांनी त्यासाठी रोपांची आगाऊ नोंदणी केली आहे. परंतु उष्णता रोज वाढत आहे.
अशा स्थितीत कंद किंवा रोपे जगविणे कठीण होते. रोपे उष्णतेत नष्ट होण्याची भीती असते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवडीचे नियोजन बदलले आहे. कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत आल्यानंतर रोपे लागवड करू.
त्यापूर्वी लागवडीसाठी नियोजित क्षेत्रात गादीवाफ्यांवर पश्चिम व दक्षिणेला धैंचा, ताग किंवा शेवरीची लागवड शेतकरी करीत आहेत. यामुळे रोपे बचावतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.