
परभणी ः ‘‘अन्न सुरक्षितता (Food Security) आणि शाश्वत भविष्यासाठी माती संवर्धनावर (Soil Conservation) भर देत शेतकऱ्यांना मातीच्या आरोग्याबाबत (Soil Health) जागरूक राहावे लागेल,’’ असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले.
जागतिक मृदा दिनानिमित्त डॉ. वैद्य यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, ‘‘माती ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. माती वाहून किंवा खरडून जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांसह सर्वांनी काळजी घ्यावी. सुपीकतेसाठी मातीची भौतिक तसेच रासायनिक धूप थांबविणे गरजेचे आहे. पोषणमूल्ययुक्त सकस अन्नधान्य उत्पादनासाठी मातीमध्ये पिकांसाठी आवश्यक सर्व अन्नघटकांची संतुलित प्रमाणात उपलब्धता असणे आवश्यक आहे.’’
‘‘जागतिक अन्न व कृषी संघटनेतर्फे (फूड ॲण्ड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन- एफएओ) विशिष्ट थीम घेऊन दरवर्षीच्या मृदा दिनापासून (५ डिसेंबर) जमिनीच्या आरोग्याबाबत जाणीवजागृती केली जाते. यंदा जागतिक मृदा दिनाचे घोष वाक्य ‘माती जिथे, अन्ननिर्मिती तेथे’ हे आहे. शेतीसाठी माती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मातीमुळे अन्नधान्य तसेच चारा पिकांचे उत्पादन मिळते.
मानव जातीसह अन्य सजीवांच्या भविष्यातील अस्तित्वासाठी मातीचे संवर्धन ही काळाची गरज आहे. अतिवृष्टीमुळे मातीची भौतिक धूप, तर तापमान वाढीमुळे रासायनिक धूप होते. कमी कालावधीत जास्त पाऊस पडतो. त्यामुळे मातीचा सुपीक थर वाहून जातो. एका वर्षात हेक्टरी १६ ते १२० टन सुपीक मातीची धूप होते. त्यामुळे दरवर्षी शेकडो किलो अन्नद्रव्ये वाहून जातात. सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. मातीची भौतिक धूप थांबविण्यासाठी शेताची बांध बंधिस्ती, वृक्षसंवर्धन आदी उपाययोजना प्राधान्यांने कराव्या लागतील,’’ असे डॉ. वैद्य म्हणाले.
‘‘तापमानात वाढीमुळे मातीतील कॅल्शियमचे प्रमाण कमी होत आहे. कॅल्शिअमचे रूपांतर कॅल्शिअम कार्बोनेटमध्ये होत आहे. परिणामी, भुसभुशीतपणा कमी होऊन जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले. रासायनिक धूप कमी करण्यासाठी संवर्धित शेती त्यात ‘रुंद वरंबा सरी’ (बीबीएफ), एका आड एक सरी, हिरवळीच्या खतांचा वापर केला तर जलसंधारणास मदत होईल,’’ असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
...या चार बाबींवर द्या लक्ष
- जमिनीची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीची धूप थांबविणे
- जमिनीच्या भारी, मध्यम, हलक्या प्रकारानुसार योग्य पिकांची निवड
- पिकांची फेरपालट आणि माती परिक्षणावर आधारित संतुलित अन्नद्रव्यांचा वापर
- रासायनिक खतांसोबत सेंद्रिय घटकांचा वापर
अन्नद्रव्यांचा होतोय जास्तीचा उपसा
‘‘मराठवाड्याच्या जमिनीतून प्रतिएकरी एकूण ७२ किलो नत्र, स्फुरद, पालाश, गंधक या घटकांचा उपसा होत आहे. मागील ४० वर्षांपासून सतत जमिनीतून दरवर्षी प्रतिएकरी २५ किलोनुसार अन्नद्रव्यांचा जास्तीचा उपसा होत आहे. तर आपण सर्व स्रोतांतून प्रतिहेक्टरी ७४ किलो नत्र, स्फुरद, पालाश, गंधक ही अन्नद्रव्ये जमिनीस देत आहोत,’’ असे डॉ. वैद्य म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.