
मुंबई : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त (Millet Year) यंदापासून भोगी हा सण (Bhogi Festival) पौष्टिक तृणधान्य दिवस (Millet Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nation) यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे.
हे वर्ष साजरे करण्यासाठी कृषी विभागाने महिनानिहाय नियोजन केले आहे. तृणधान्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून मकरसंक्रांतीच्या एक दिवस आधी साजरी करण्यात येणारी भोगी पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरी करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत ज्या ज्या विभागांकडून बालके, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकारी यांना विविध योजनांतर्गत उपहारगृहातून फराळ, माध्यान्ह भोजन किंवा जेवण पुरविण्यात येते.
अशा विभागांनी भोगीदिवशी तृणधान्यांचा जाणीवपूर्वक वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भोगीदिवशी आहारात तृणधान्याचा वापर करण्यात येतो. या परंपरेचा आधार घेऊन कृषी विभागाने ही मोहीम आखली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाकडे ठराव पाठविण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाल्यानंतर संपूर्ण भारतात तृणधान्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत. महाराष्ट्रात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी या तृणधान्यांची लागवड केली जाते.
गेल्या १० वर्षांच्या तुलनेत २०२१-२२ या वर्षात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि अन्य तृणधान्यांचे क्षेत्र कमी झाले आहे. ज्वारीचे क्षेत्र २४.२३ लाख हेक्टर, बाजरीचे ५.३१ लाख हेक्टर, नाचणीचे ४७ हजार हेक्टर आणि अन्य तृणधान्यांच्या लागवडीचे क्षेत्र ५९ हजार हेक्टरने कमी झाले आहे. २०१०-११ मध्ये या तृणधान्यांचे क्षेत्र ५२ लाख ७३ हजार हेक्टर होते. ते २२ लाख ७४ हजार हेक्टरवर आले आहे. गेल्या १० वर्षांत ३० लाख हेक्टरने लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे.
आधारभूत किमतीत वाढ
पौष्टिक तृणधान्य पिकाच्या २०१७-१८ च्या किमान आधारभूत किमतीमध्ये यंदा केंद्र शासनाने प्रतिक्विंटल दरात वाढ केली आहे. ज्वारीसाठी १७२५ वरून २९९० रुपये, बाजरीसाठी १४२५ वरून २३५० रुपये तर नाचणीसाठी १९०० रुपयांवरून ३५७८ रुपये वाढ केली आहे.
महाराष्ट्र मिलेट मिशन
- या वर्षानिमित्त २०० कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद
- शेतकऱ्यांना उत्पादन वाढ व तंत्रज्ञान प्रसाराकरिता अर्थसाह्य
- पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसाह्य करणे
- पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, स्मार्ट प्रकल्प यांच्या माध्यमातून २०० पेक्षा जास्त प्रक्रिया युनिट स्थापन करण्याचे उद्दिष्ट
- पौष्टिक तृणधान्य उत्पादनापासून मूल्यवर्धन आणि विक्रीपर्यंत मूल्य साखळी विकसित करण्याचे उद्दिष्ट
- शेतकरी उत्पादक ३० कंपन्यांना अर्थसाह्य करण्याचे नियोजन
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.