
मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे कथित जमीन घोटाळा (Grazing Land Scam) प्रकरण आणि त्यापाठोपाठ उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावरील जमीन घोटाळ्याच्या आरोपांची दखल भाजपने घेतली आहे. ‘तुमच्या मंत्र्यांना आवर घाला. बेकायदेशीर कामे खपवून घेऊ नका,’ असा सल्ला भाजप पक्षश्रेष्ठींनी आणि राज्यातील प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना दिला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप करत एनआयटी जमीन घोटाळ्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यापाठोपाठ कृषिमंत्री सत्तार यांच्या महसूल राज्यंमत्रिपदाच्या काळातील जमीन घोटाळे बाहेर काढत सत्ताधाऱ्यांना महाविकास आघाडीने खिंडीत पकडले. मात्र, विरोधकांच्या मवाळ भूमिकेमुळे सत्ताधारी खिंडीतून निसटले.
दुसऱ्या आठवड्यात अब्दुल सत्तार यांच्या अकोला येथील कथित गायरान घोटाळ्याचे प्रकरण बाहेर आले. १५० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे प्रकरण शांत झाले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी शंभूराज देसाई, संजय राठोड यांच्यासह अब्दुल सत्तार यांच्या आणखी तीन जमीन व्यवहार प्रकरणांना विरोधकांनी उकळी दिली.
अधिवेशनात विशेष म्हणजे भाजपच्या एकाही नेत्यावर गंभीर आरोप झाले नाहीत. सध्या मुख्यमंत्री शिंदे यांचे केंद्रीय नेतृत्व अमित शहा यांच्याशी थेट संबंध असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. सहाजिकच भाजपचा फडणवीस गट या जवळिकीमुळे नाराज आहे. त्यामुळे शिंदे गटातील एकेक प्रकरण विधानसभेत बाहेर येत होते, अशी चर्चा आहे.
...तर सरकार बदनाम होईल
शिंदे गट आधीपासून बेताल वक्तव्ये करत असला तरी त्यांना भाजपने रोखले नाही. मात्र, आता कार्यपद्धतीवरूनच गंभीर आरोप झाल्याने भाजपने याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. केंद्रीय नेतृत्वाने याबाबत कुठलीही सूचना केली नसली तरी भाजपच्या राज्यपातळीवरील मोठ्या नेत्यांनी शिंदे यांना याबाबत सूचना केली आहे. ‘असेच चालत राहिले तर सरकार बदनाम होईल. त्यामुळे कार्यपद्धती बदलण्याच्या सूचना द्या,’ असेही सांगण्यात आल्याची चर्चा आहे.
शिंदे गटात सुंदोपसुंदीची चर्चा
अब्दुल सत्तार यांना मुलींना टीईटी परीक्षेत लाभ मिळवून देणे, बेकायदेशीररीत्या गायरान जमीन हस्तांतरण करणे आदी बाबींवरून टार्गेट केले जात होते. त्यात सिल्लोड येथे भरविलेल्या महोत्सवातला कृषी विभागाची यंत्रणा जुंपल्याने ते आयतेच विरोधकांच्या जाळ्यात सापडले.
त्यानंतर त्यांनी विरोधकांऐवजी स्वकियांवरच आरोप करत या सर्व आरोपामागे शिंदे गटातील मंत्रिपद न मिळालेले आमदार असल्याचा आरोप केला. शिंदे गटातील आमदारांत मंत्रिपदासाठी एकमेकांचे पंख छाटण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यातून अनेक प्रकरणेही बाहेर येत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.