
APMC Election Update : ‘‘एकीकडे शेतकरी विरोधी धोरण (Anti Farmer Policy) राबवायची आणि दुसरीकडे शेतकरी हिताच्या संस्था ताब्यात घेण्यासाठी खेळी खेळायची. हीच दुटप्पी नीती भाजपच्या अंगलट आली आहे,’’ असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला लगावला.
राज्यात बाजार समिती निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेसला एकहाती सत्ता राखण्यात यश मिळाले. काही बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. भाजपला या निवडणुकांमध्ये मतदारांनी नाकारल्याचे सिद्ध झाले. त्या पार्श्वभूमीवर पटोले बोलत होते.
पटोले म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती.
एकंदरीत स्थिती पाहता यापूर्वी मिळणाऱ्या उत्पन्नापासून शेतकऱ्यांवर वंचित राहण्याची वेळ शासनकर्त्यांच्या धोरणांमुळे आली आहे. आज बाजारात कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. केंद्र सरकार केवळ हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते.
शेतकऱ्यांना लुटणारी व्यवस्था सध्याच्या सरकारने उभारली आहे. एकीकडे शेतकरी हिताचा आव आणायचा, त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या, असे दाखवायचे आणि दुसरीकडे त्यांच्या लुटीसाठी प्रयत्न करायचे ही भाजपची नीती आहे.’’
‘विधानसभा, लोकसभा निवडणुकांत वेगळे चित्र राहील’
‘‘दरवाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली होती. मात्र त्यांची पुरती निराशा केंद्र सरकारने केली आहे. शेतकरी हिताकरिता ‘मन की बात’ नाही तर ‘धन की बात’ करणे गरजेचे आहे.
परंतु तसे न करता इतर मुद्द्यांवरच दिशाभूल करण्यात येते. शेतकऱ्यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी बाजार समित्यांमध्ये भाजपला नाकारले. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये देखील यावेळी चित्र वेगळे राहील,’’ असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.