
मोसंबीच्या अधिकच्या उत्पादनवाढीसाठी (Mosambi Production) योग्य व्यवस्थापनासह गुणवत्तापूर्ण वाणाची (Mosambi Verity) निवड, वर्षातून एकाच बहराचे नियोजन आणि रासायनिक-सेंद्रिय खतांचा (Fertilizer Management) मेळ साधणे आवश्यक आहे असे प्रतिपादन बदनापूर, जालना येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी केले.
सकाळ- ॲग्रोवन प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशीच्या (ता. १५) अखेरच्या सत्रात मोसंबी, डाळिंब फळबाग व्यवस्थापनातील नवीन तंत्रे या चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. पाटील म्हणाले, की
मराठवाड्यामध्ये अलीकडील काळात मोसंबी पिकाचे क्षेत्र वाढत असताना उत्पादकता मात्र घटत आहे. पूर्वी मोसंबी बाग लावल्यानंतर कमीत कमी २५ वर्षे उत्पादन मिळत होते. मात्र अलीकडे सहा ते सात वर्षांत बाग काढावी लागते.
अलीकडे छाटणीचे प्रतिकूल परिणामही दिसू लागले आहेत. अति घनलावडीचा प्रयत्नही करू नये, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. मोसंबी पक्वतेच्या काळात डास सायंकाळी सात ते नऊ या वेळेत असतात.
अशा वेळी आपण बागेत ओले गवत पेटवून धूर केला तर डासांवर नियंत्रण येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले...
मोसंबीमध्ये एकाच वर्षांमध्ये तीन बहरांचे नियोजन केल्यास झाडे पिवळी पडून नुकसान होऊ शकते.त्यासाठी एकाच बहराचे नियोजन केले पाहिजे.
झाडे बाल्यावस्थेत असताना फळधारणेसाठी प्रयत्न करू नये.
दोन बहरांसाठी बागा ताणावर सोडल्यानंतर अवकाळी पाऊस पडल्यास बहराऐवजी पालवी फुटते.
बहर नसला तरीही खताची मात्रा आवश्यक आहे.
बागांमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे.
समतोल साधण्यासाठी ५० टक्के रासायनिक, ३० टक्के सेंद्रिय, २० टक्के जैविक खतांचा वापर करावा.
शेतकऱ्यांचा गौरव
या वेळी प्रगतिशील शेतकरी गेवराई येथील रवी दाभाडे, उदंड वडगाव येथील (बीड) अक्षय जाधव, चिंचवडगाव (बीड) रामप्रसाद घुगे, सातेफळ (अंबेजोगाई) माउली जाधव, तीर्थ (खु., तुळजापूर) कैलास केसरे, बारुळ (तुळजापूर) बापूराव वट्टे, आष्टा कासार (लोहारा) तानाजी कागे, पोहरेगाव (लातूर) प्रवीण राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
कमी पाण्याच्या क्षेत्रात डाळिंब फायदेशीर : भोसले
करमाड (जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील डाळिंब उत्पादक विठ्ठल भोसले म्हणाले, की डाळिंबामुळे लखपती झालेले शेतकरी एकीकडे पाहायला मिळतात. तर काही गावांमध्ये कर्ज झाल्याचेही आपल्या कानावर येते.
मात्र कमी पाण्याच्या क्षेत्रात डाळिंब हे पीक फायदेशीर आहे. जे शेतकरी रोज शेतात जाऊन शेती करतात, त्यांनीच हे पीक घ्यावे. कारण बागांवर नियंत्रण ठेवल्याशिवाय फळ मिळत नाही.
एकरी १० लाख रुपयांचे उत्पादन देण्याची या पिकाची क्षमता आहे. तेलकट डाग रोगामुळे नुकसान होत आहे. मात्र संशोधन व प्रयोगांतून या रोगावर शेतकऱ्यांनी मात करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही भोसले म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.