
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सतत चार-पाच दिवस पडलेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) परिणाम काजूवर (Cashew Crop Damage) झाला. काही ठिकाणी काजू बी काळवंडले आहे. तर काही ठिकाणी मोहोर (Cashew Blossom) काळपट झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहोराचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबरपासून काजूला पालवी आणि मोहोर येण्यास प्रारंभ होतो. या वर्षी पाऊस लांबल्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोहर येण्यास सुरुवात झाली. झाडांना चांगला मोहोर येत असतानाच डिसेंबरमध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मंदोस चक्रीवादळात रूपांतर झाले.
याचा प्रभाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणवला. सलग चार- पाच दिवस अवकाळी पाऊस, जोरदार वारे वाहत होते. सलग चार -पाच दिवस पाऊस पडत असल्यामुळे त्या कालावधीत बागायतदारांना फवारणीदेखील करता आलेली नाही. त्यानंतर बागायतदारांनी फवारणीला सुरुवात केली.
मात्र त्याचा परिणाम आता बागांमध्ये दिसून येऊ लागले आहेत. अनेक ठिकाणी काजूची लहान फळे काळवंडली आहेत. याशिवाय काही ठिकाणी मोहरदेखील काळवंडला आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोरापासून चांगले उत्पादन मिळते. हा मोहोर वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांची आता दुसऱ्या टप्प्यातील मोहरावर मदार आहे. त्यातून उत्पादन मिळेल, या आशेने बागायतदार पुन्हा बागांमध्ये काम करीत आहेत.
माझी काजूची १०० हून अधिक झाडे आहेत. या झाडांना चांगला मोहोर आला होता. परंतु अवकाळी पावसामुळे हा मोहोर कुजला आहे. पहिला मोहर वाया गेला आहे. आता नव्या मोहरावर फवारणी करण्यात आली आहे.
- अक्षय पवार, काजू बागायतदार, खांबाळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.