
वसई, जि. पालघर ः जिल्ह्यात विविध प्रकारची फुले आणि भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील फुले आणि भाजीपाल्याला मुंबईसह ठाणे परिसरातून मोठी मागणी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा मोठा परिणाम या शेतीमालाच्या उत्पादनावर झाला आहे. या ढगाळ वातावरणामुळे फुले आणि भाजीपाल्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे केलेली मेहनत व पैसे वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
वसईसह पालघर जिल्ह्यात चाफा, जास्वंद, लिली, टगर यासह विविध फुलांची तसेच मिरची, फ्लॉवर, भेंडी, गवार, पालक, मेथी, दुधी, लाल माठ अशा विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते. शेती मशागतीपासून पीक येईपर्यंत शेतकऱ्यांना अपार मेहनत घ्यावी लागते. मात्र नैसर्गिक संकट, हवामानात होणारे बदल याचा परिणाम पिकांवर होत असतो. ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने या फूल आणि भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
फूल उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी एक हजार झाडांमागे चाफ्याची आठ हजार, जास्वंदाची २० हजार इतकी फुले मिळत होती; परंतु आता चाफ्याची दोन ते अडीच हजार, तर जास्वंदाची दोन हजार फुले मिळत आहेत. जिल्ह्यात नारळाच्या बागाही मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु नारळाच्या संख्येत घट झाली आहे.
विक्रमगडमध्ये रब्बी धोक्यात
विक्रमगड : तालुक्यातील काही भागांत बुधवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार गडगडाटांसह पडलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झाला. आधीच कोरोनामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. रब्बी हंगामातील पिके तसेच भाजीपाला लागवड शेतकऱ्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोनचाफा, जास्वंद फुलशेतीला ढगाळ वातावरणाचा फटका बसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वातावरण बदलल्याने फुलांचे प्रमाण नगण्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिंक संकट आेढावले आहे.
- सुभाष भट्टे, वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त आदर्श शेतकरी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.