
तेल्हारा, जि. अकोला ः रब्बी हंगामात लागवड केलेले हरभऱ्याचे पीक (Chana Crop) कुठे काढणीला, तर कुठे फुलोर, घाटे धरण्याच्या स्थितीत आहे. सध्या या पिकात रानडुकरांचे कळप (Wild Boars) कमालीचे नुकसान (Crop Damage) करीत आहेत.
पिकात ठिकठिकाणी खड्डे करीत आहेत तर पिकाची नासधूसही अधिक करीत असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना झेलावे लागत आहेत. याबाबत वन्यजीव विभागाला कळवूनही काही उपाययोजना होत नसल्याने शेतकरी अधिक चिंतातूर झालेले आहेत.
तेल्हारा तालुक्यात यावर्षी पावसामुळे खरिपातील सोयाबीन, मूग उडीद, कपाशी अशा विविध पिकांचे उत्पादन घटले होते. ही तूट भरून निघेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी रब्बीत गहू, हरभरा व इतर पिकांची मोठ्या क्षेत्रावर लागवड केली.
सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असल्याने पिकालाही फायदा झाला. पिके जोमाने वाढली. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण व धुक्यामुळे मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भावही झाला. अशातच रब्बी पिकांना वन्यजिवांकडून मोठे नुकसान केले जात आहे.
प्रामुख्याने रानडुकरे या भागात पिकात धुमाकूळ घालत आहेत. हरभरा पिकात डुकरे ठिकठिकाणी जमीन उकरत असल्याने हरभऱ्याची झाडे मुळासकट उपटली जात असून, जागेवरच वाळत आहेत.
पीक परिपक्व होण्यापूर्वीच झाडे उपटल्याने नुकसान झेलावे लागत आहेत. तेल्हारा तालुक्यात या हंगामात हरभरा पिकाची सुमारे १८ हजार पाचशे हेक्टर पेक्षा अधिक लागवड झालेली आहे तसेच रब्बी ज्वारी मका या पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली हरभरा मका ज्वारी या तीनही पिकांना रानडुकरांकडून नुकसान केले जात आहे.
प्राण्यांपुढे शेतकरी हतबल
रानडुकराचे कळप वाढत आहेत. हा प्राणी बऱ्याचवेळा हिंस्र होऊन हल्लेसुद्धा करतो. याबाबत शेतकरी वन्यजीव विभागाकडे वारंवार माहिती देतात. परंतु या रानडुकरांना पायबंद घालण्यासाठी काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत. या डुकरांपुढे शेतकरी हलबल झाले आहेत. दिवसभर काम केल्यानंतर आता पीक राखणीसाठी रात्रीचे जागरणसुद्धा करावे लागत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.