
पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी (Mandous Cyclone) प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात वादळी पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. राज्याच्या किमान तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रविवारी (ता. ११) धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारात यंदाच्या हंगामातील नीचांकी १० अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. १२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कमी - अधिक होत आहे. राजस्थानामधील चूरू येथे रविवारी (ता. ११) देशाच्या सपाट भू-भागावरील सर्वांत नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. ५.५ अंशांपर्यंत खाली घसरलेला पारा पुन्हा १० अंशांपार पोचला आहे. तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्याच्या बहुतांशी भागात रविवारी ढगाळ वातावरण झाले. आज (ता. १२) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तुरळक पावसाचा अंदाज आहे.
अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची शक्यता
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ निवळल्यानंतर केरळ, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली अरबी समुद्रात येताच उद्या (ता. १३) पुन्हा कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे.
वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा :
कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर पुणे, सातारा, कोल्हापूर.
मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.