
Nagpur News ‘‘उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही. ४० आमदार त्यांना सोडून गेले. आताही रोज त्यांना लोक सोडून जात आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभेला तडा गेला आहे.
त्यांच्या सभांना लोक येत नाहीत, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल,’’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी टीका केली.
नागपूर येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पंतप्रधान मोदी यांच्यावरील आरोपांविषयी बावनकुळे म्हणाले, ‘‘ज्या वेळी उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हा मोदींवर स्तुतिसुमने उधळत होते, आमच्याकडे त्याबाबतचे रेकॉर्ड आहे.
आता तुम्ही विरोधी लोकांसोबत गेल्याने तुम्हाला विरोध करणे भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक निवडणुकीत जय बजरंगबलीचा नारा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा आम्हाला समज आली तेव्हापासून आम्ही हनुमान मंदिरात जातो.
काँग्रेसने बजरंग दलाबाबत घेतलेल्या निर्णयाचा जनता मतदानामधून उत्तर देईल. कर्नाटकमध्ये भाजपला विजय मिळणारच आहे. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसला ईव्हीएममधून ४४० व्होल्टचा झटका लागणार आहे.’’
‘राष्ट्रवादी संपर्कात नाही’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. शरद पवार कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतील, शेवटी त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो ते घेतील.
राष्ट्रवादीचा कुठलाही नेता आमच्या संपर्कात नाही. कोणीही संपर्क केलेला नाही. कोणी आला तर आमचा झेंडा आणि दुपट्टा तयार आहे. आम्ही कोणाला ये म्हणणार नाही. मात्र आम्ही संन्यासी नाही, राजकीय पक्ष आहोत,’’ असेही बावनकुळे म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.