
सातारा ः ‘‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चला जाणूया नदीला अभियान (River Campaign) राबविण्यात येत आहे. त्यात नदी संवाद यात्रा आयोजित केली आहे. त्या उपक्रमांना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे,’’ असे मत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केले.
कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावर कृष्णा नदी प्रणाली संवाद यात्रेचा समारोप झाला. त्या वेळी जिल्हाधिकारी जयवंशी बोलत होते. या वेळी ‘चला जाणूया नदी’ अभियानाचे राज्यस्तरीय समन्वयक नरेंद्र चौघ, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, प्रांताधिकारी सुनील गाढे, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, तहसीलदार विजय पवार, कार्यकारी अभियंता अशोक पवार, नदी समन्वयक बजरंग चौधरी, प्रदीप पाटणकर, प्रकाश पाटील उपस्थित होते.
जयवंशी म्हणाले, ‘‘नदीच्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नद्यांमध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण झाले आहे. त्यावर मात करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये प्रशासनाने व नागरिकांनी पूर्ण क्षमतेने सहभागी होणे गरजेचे आहे. मुलांनी आपल्या पालकांना, तसेच आजूबाजूच्या ज्येष्ठ नागरिकांना नदी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.’’
चौघ म्हणाले, ‘‘नदीचे आरोग्य उत्तम असेल तर आपले आरोग्य चांगले राहते. नदीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी सर्वांनीच योगदान दिले पाहिजे. नद्या प्रदूषण थांबविणे, नद्या स्वच्छ करणे व पुन्हा प्रवाहित करणे यासाठी चला जाणूया नदीला हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक टप्पा म्हणजे नदी संवाद यात्रा आहे. त्यातून जमा झालेली माहिती अहवाल स्वरूपात शासनास सादर केली जाईल’’ या वेळी कृष्णा, कोयना, वेण्णा, येरळा व माणगंगा या नद्यांच्या पाण्याचे पूजन करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.