
जालना : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे समृद्धी महामार्गाच्या (Samrudhhi Mahamarg) लोकार्पण सोहळ्यासाठी रविवारी (ता.११) येत आहेत. मात्र, त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर (Maharashtra Karnataka Border Issue) आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतरच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करावे,’’ असा टोला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे आयोजित ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी (ता.११) झाले. या प्रसंगी ठाकरे बोलत होते. या वेळी संमेलाध्यक्ष शेषराव मोहिते, मावळते संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार, कौतुकीराव ठाले-पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल परब, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे, संजय जाधव, राजेश टोपे, कैलास गोरंट्याल, विक्रम काळे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, ‘‘मराठवाडा संतांची जन्मभूमी आहे. या भूमीने अन्यायाविरोधात लढा उभारला. महाराष्ट्राने देशाला शिकवण दिली. मात्र, बाहेरून येणाऱ्यांनी आमच्या दैवतांचा अवमान केला तर खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे साहित्यिकांनीही न भिता अशा बाबींवर लिखाण करावे. राज्यकर्त्यांच्या विरोधात लिखाण केल्यावर, बोलल्यावर तुरूंगात टाकले जाणार नाही, याची खात्री लोकशाहीत दिली पाहिजे. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी साहित्यिक आणि राजकारण्यांनी हातात हात घेऊन काम केले पाहिजे.’’
‘‘लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक न्याय व्यवस्थाही केंद्र सरकार हाती घेण्याचा प्रयत्न करत आहे. न्यायमुर्तीही पंतप्रधान नेमू असे म्हणत असतील तर ही लोकशाही नाही. राज्यपालांच्या व्यक्तव्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न आता पंतप्रधान करतात. पंतप्रधान हे देशाचे पालक आहेत. त्यामुळे पालकाप्रमाणे बोला, पण महाराष्ट्र हा पालकाची भाजी नाही, हे लक्षात ठेवावे. कारण आम्ही तुमचे मिंधे नाही. जे मिंधे होते ते तुमच्याकडे आले,’’ असेही ठाकरे म्हणाले.
मराठवाड्याची उपेक्षा कायम
‘‘स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर मराठवाड्याच्या वाट्याला उपेक्षा कायम आहे,’’ असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवाजी चोथे यांनी सांगितले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्र द्वेषी आहेत. राज्यातील महापुरूषांसंदर्भात सतत वक्तव्य करत आहेत. त्यांच्या या व्यक्तव्यांच्या पाठीमागे कुचक्या डोक्याचे कोण आहेत, याचा शोध साहित्यिकांनी घेऊन त्यांच्यावर खडतर लिखाण करावे.
- कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.