
Weather Update News अलिबाग : अवकाळी पडलेला पाऊस (Unseasonal Rain), त्यानंतर वाढलेले तापमान याचा विपरीत परिणाम आंब्यावर (Mango) झाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांत वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे रायगड जिल्ह्यात फळधारणेपूर्वीच मोहर गळू लागला आहे.
त्यामुळे २५० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकाला फटका (Mango Crop Damage) बसण्याची शक्यता असल्याने बागायतदार धास्तावले आहेत.
रायगड जिल्ह्यातील ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड केली जाते. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे.
यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रीक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदा मुबलक पाऊस आणि थंडी पडल्याने आंबा पीक चांगले येईल, अशी अपेक्षा बागायतदारांना होती.
परंतु, अवकाळी पाऊस, तापमान वाढीमुळे फळ गळतीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे रोहा, मुरूड, श्रीवर्धन, तळा तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झाले असून आंबा उत्पादनात मोठी घट होईल, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पाऊस आणि त्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे उशिराने आलेला मोहर गळून पडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात बदलत्या हवामानाचा २५० हेक्टर क्षेत्रावरील आंबा पिकावर परिणाम होऊ शकतो. नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी तलाठी किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
- डी. एस. काळभोर, कृषी उपसंचालक, रायगड
पावसापेक्षा उष्णतेचा मोठा फटका पिकावर झाला आहे. या उष्णतेमुळे नव्याने आलेला मोहर तग धरू शकला नाही. फळधारणा होत असतानाच हे संकट ओढावले असल्याने अर्ध्याहून अधिक पीक वाया जाणार आहे.
- सदानंद पाटील, आंबा बागायतदार
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.