
सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आणि काही भागांत अवकाळीच्या सरी कोसळल्या. यात गहू, ज्वारी, हरभरा या रब्बी पिकांसह द्राक्ष बागांना फटका बसत आहे. यंदा अतिवृष्टीने आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आता पुन्हा या बदलत्या वातावरणाने चिंता वाढवली आहे.
सलग दोन दिवस रविवारी (ता. ११) आणि सोमवारी (ता. १२) दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. तर दोन्ही दिवशी रात्री अवकाळी पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, माढा, बार्शी, माळशिरस या तालुक्यांत हे वातावरण राहिले. पंढरपुरातील कासेगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे क्षेत्र आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य भागात ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. आधीच अतिवृष्टीने खरिपात पिकांचे नुकसान झाले. पण आता पुन्हा हा पाऊस आणि ढगाळ वातावरण या पिकांचे नुकसान करण्याची शक्यता आहे. त्यातच थंडीही वाढते आहे.
थंडीचा गहू, हरभऱ्याला काहीसा फायदा होणार असला, तरी पावसाची चिंता आहे. पंढरपूर, बार्शी, उत्तर आणि दक्षिण सोलापुरात द्राक्षाच्या छाटण्या होऊन आता द्राक्ष बागाही सेटिंग अवस्थेत आहेत. डाळिंबावर तेलकट डागसारख्या रोगाची भीती आहे. तर मोहोळ, अक्कलकोट भागात अनेक ठिकाणी आंब्याला चांगला मोहोर लागला आहे.
शेतकऱ्यांचा खर्च वाढणार
या वातावरणामुळे द्राक्षावर डाऊनी, कुजवा रोग येण्याची शक्यता आहे. डाळिंबात तेल्याला वातावरण पोषक होणार आहे. तर गव्हावर तांबेरा रोगाची शक्यता आहे. पिकांच्या या अवस्थेमुळे अर्थात, फवारणी खर्चात वाढ होणार आहे. जवळपास २० ते ३० टक्के शेतकऱ्यांचा कीटकनाशकांवरील खर्च वाढणार आहे.
अतिवृष्टीमुळे आम्ही आधीच ज्वारी, गव्हाची उशिरा पेरणी केली. आता अवकाळी पावसाने पुन्हा नुकसान होण्याची भीती आहे.
- अप्पा कोरके, शेतकरी,
गुळवंची, ता. उत्तर सोलापूर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.