
औरंगाबाद : फळबागांमध्ये (Orchard) कृषी निविष्ठा व इंधन वापरामुळे हरितगृह वायू उत्सर्जनाचे (Greenhouse Gas Emissions) प्रमाण नेमक किती, हे जाणून घेण्यासाठी जालना जिल्ह्यातील बदनापूर कृषी महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विषयातील पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी प्रयोग हाती घेतला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राच्या (Mosambi Research Center) मार्गदर्शनात हा प्रयोग राबविला जातो आहे.
मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, यांच्या माहितीनुसार, हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे होणाऱ्या हवामान बदलांना रोखणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामती यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला होता.
या करारानुसार बदनापूर येथील कृषी महाविद्यालयाच्या उद्यानविद्या पदव्युत्तर पदवीची विद्यार्थिनी लिंबू, मोसंबी, सीताफळ, ड्रॅगन फ्रुट आदी फळपीक बागांमध्ये विविध प्रकारच्या कृषी निविष्ठांचा, यांत्रिकीकरणाचा व यंत्रासाठी होणाऱ्या इंधन वापरातून किती प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जन होते, या विषयीची माहिती संकलित करत आहेत. मूळची अरुणाचल प्रदेशमधील असलेली कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी टोको नीली ही या सविस्तर माहिती संकलनाचे नेतृत्व करते आहे.
विविध भागांतील फळ पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांना सहकारी विद्यार्थ्यांसह भेटी देऊन ते फळबागसाठी नेमक्या कोणत्या कृषी निविष्ठांचा वापर करतात, रासायनिक खते कोणती वापरतात, ते वापरण्याचे प्रमाण किती, ट्रॅक्टरसह इतर यंत्रांचा नेमका वापर किती, त्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा वापर किती, यासह इतर प्रश्नांची माहिती नोंदवून घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही माहिती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेती मशागतीच्या पद्धतीतून वातावरणात किती हरितगृह वायु उत्सर्जन होते याची चाचपणी करण्यासाठी संकलित होणारी माहिती महत्त्वाची ठरणार आहे.
नुकतीच औरंगाबाद जिल्ह्यातील कुबेर गेवराई येथे रघुनाथ कुबेर, भगवान कुबेर, अरुण कुबेर, दिलीप कुबेर, सारंगधर कुबेर आदींच्या लिंबू बागांना भेट देऊन त्यांच्याकडून आवश्यक ती सविस्तर माहिती नोंदवून घेण्यात आली. शिवाय माती नमुनेही घेण्यात आले. डॉ. संजय पाटील यांच्या नेतृत्वात गोपाल चव्हाण, कुणाल सातव, शिवाजी वाजगे या विद्यार्थ्यांनी माहिती व माती नमुने संकलित करण्यासाठी सहकार्य केले. वार्षिक शेतातील पिकांच्या तुलनेत विविध बागायती पिकांच्या कृषी निवास व इतर मशागतींच्या माध्यमातून होणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जन क्षमतेवर लक्ष ठेवल्याने हवामान बदलाशी संबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी ब्लू प्रिंट विकसित करण्यात मदत होईल.
जवळपास सहा महिने माहिती संकलन प्रक्रिया सुरू राहील. त्यानंतर संकलित झालेला सर्व डेटा हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण जाणून घेण्यासाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकली जाईल. त्यानंतर हरितगृह वायू उत्सर्जन रोखण्यासाठी नेमकं काय करावे याविषयी सल्ले दिले जातील.
- डॉ. संजय पाटील, प्रभारी अधिकारी मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर, जि. जालना.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.