
Nagpur News : पुलवामा घटनेवर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून ‘शर्म करो मोदी, शर्म करो’, बॅनरखाली सोमवारी (ता. १७) राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, की पुलवामा घटनेने सारा देश हादरला होता. सीआरपीएफच्या ४० जवानांना स्फोटाने उडवून देण्यात आले. एवढी मोठी घटना घडली तरी अद्याप या घटनेचे सत्य बाहेर आलेले नाही. या घटनेच्या तपासाचे काय झाले? या स्फोटात ३०० किलो आरडीएक्स वापरण्यात आले.
ते कुठून आले? जवानांना विमानसेवा का पुरवली नाही? गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? पुलवामा घटना ही सरकारची चूक आहे, असे सत्यपाल मलिकांनी सांगितल्यावर त्यांना गप्प राहण्यास का सांगितले? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने दिलेली नाहीत. या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारला द्यावीच लागतील.
पुलवामा घटनेवर सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारची झोप उडवल्याने या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजप सरकारने कितीही प्रयत्न केला, तरी जनता त्यांच्या षड्यंत्राला बळी पडणार नाही. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेसंदर्भात एका मुलाखतीत उपस्थितीत केलेले प्रश्न अत्यंत गंभीर व देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे.
पुलवामा घटनेचे सत्य बाहेर यावे यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी, आघाडी संघटना, सेल, विभागचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे पटोले म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.