अमरावती : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये होणाऱ्या पानवेली (Panveli), पानपिंपरी (Panpimpari) व औषधी वनस्पतींचे (Medicinal Plants) अस्तित्व कायम राहावे, यासाठी शासनाने अमरावती विभागीय पानवेली, पानपिंपरी, औषधी उत्पादक शेतकरी विकास अभियान समितीस मान्यता दिली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिली आणि एकमेव समिती आहे. (Conservation Of Medicinal Plant)
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये बारी समाजाकडून मोठ्या प्रमाणावर पानवेली, पानपिंपरी व औषधी वनस्पतींची शेती होते. त्यामध्ये खायची पाने (विडा), औषधी गुणयुक्त असलेली पानपिंपरी तसेच सफेद मुसळी व इतर औषधी वनस्पतींचा समावेश आहे. अकोट (अकोला) अंजनगाव सुर्जी, अचलपूर (अमरावती) आणि बुलडाणा जिल्ह्याचा काही भाग अशा अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये या पिकांचे पारंपारिक पद्धतीने व्यवस्थापन होते.
मात्र गेल्या काही वर्षांत ही पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना कीडरोगांचा मोठा सामना करावा लागत आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी हे पीक सोडत पर्यायी पिकांचा अवलंब केला. त्यामुळे वनस्पती पिकांचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी स्वतंत्र संशोधन समितीचे गठण करावे, या समितीने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. त्यानुसार तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासमोर ही बाब मांडली. त्यांनी या समितीस मान्यता दिली.
...यांचा असेल समितीत समावेश
विभागीय आयुक्त, शेतकरी प्रतिनिधी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असेल. त्याद्वारे या भागातील औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.