Avkali Paus
Avkali PausAgrowon

Avkali Paus : वादळी पाऊस, गारपिटीने शेतीपिकांचे नुकसान

शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला; कांदा, द्राक्षाला फटका

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि वऱ्हाडात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह आलेल्या पावसाने रब्बी पिकांसह फळ बागांना तडाखा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि चांदवड तालुक्यांमध्ये झालेल्या गारपिटीने उन्हाळ कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या पिकांच्या नुकसानीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांत शनिवारपासून (ता. ४) वादळी वाऱ्यासह पावसाचे संकट घोंगावत आहे.

असे असताना सणासुदीत रविवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ६) सलग दोन दिवस वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने अनेक तालुक्यांना झोडपून काढले. मंगळवारी (ता. ७) कळवण व चांदवड तालुक्यांना गारपिटीचा तडाखा बसला.

यामध्ये काढणीसाठी येणाऱ्या उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान झाले. गेली काही दिवस पावसाने दणका दिल्याने हिरवी मिरची व टोमॅटो लागवडीचे नुकसान झाले.

चांदवड तालुक्यातही वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपिटीने गहू, कांदा आणि द्राक्ष पिकांचे नुकसान झाले.

Avkali Paus
सातारा जिल्ह्यात वादळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान

वऱ्हाडात दोन दिवसांपासून वादळी पावसाने तडाखा दिला आहे. अकोला, बुलडाणा जिल्ह्यात या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सध्या रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, मका ही पिके उभी आहेत.

गव्हाचे पीक अनेक ठिकाणी जमीनदोस्त झाले. सोंगणी केलेला हरभरा ओला झाला. ज्वारी, मक्याची पीकही जमिनीवर लोळले आहे. या रब्बी पिकांसह संत्रा बागांमध्ये नुकसान झाले. संत्रा बागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फळगळती प्रचंड झाली.

नगर जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांत वादळी पावसाचा तडाखा बसला. काही भागांत अल्प प्रमाणात गाराही पडल्या. पावसाने काढणीला आलेल्या गहू, ज्वारीसह आंबा व इतर फळ पिकांचे नुकसान झाले.

पाथर्डी, नगर, संगमनेर, अकोले, कर्जत, श्रीरामपूर, राहुरी भागांत पावसाचा जोर अधिक होता. राहुरी तालुक्यातील पूर्व भागात पावसाने रब्बीची पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कायगाव परिसरात विजांच्या कडकडाटात आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासोबत आलेल्या वादळी पावसाने कायगाव (ता. गंगापूर) परिसराला चांगलेच झोडपले. यामुळे काढणी आलेले गहू, कांदा, हरभरा आदी रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.

शेतकऱ्यांच्या शेतीबांधावरील आंबा, चिंच, चिकू आदी फळ झाडांचे अतोनात नुकसान झाले. परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत जोरदार वारे विजांच्या कडकडात हलका ते मध्यम पाऊस झाला. वाऱ्यामुळे गहू,ज्वारीचे पीक आडवे झाले.

हरभरा भिजला. संत्रा, आंबा आदींची फळगळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सेनगाव तालुक्यात वीज कोसळ्यामुळे एकाचा मृत्यू झाला.


आंबा, काजूला फटका
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात मंगळवारी (ता. ७) पावसाच्या हलक्या पावसाने हजेरी लावली. अचानक बरसलेल्या पावसाने आंबा, काजू मोहराला बुरशी पकडण्याची शक्यता अधिक असून, फळ बागायतदारांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com