
Pune News राज्यात सुरू असलेला वादळी पाऊस आणि गारपिटीचे (Hailstorm) सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाही. विविध जिल्ह्यांत सातत्याने वादळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीचा धुमाकूळ सुरुच आहे.
या पावसामुळे काढणीस आलेली रब्बी पिके, उन्हाळी पिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान (Crop Damage) वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे.
बीड जिल्ह्यात शनिवारी (ता.११) अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि वीज पडल्याने एक शेतकऱ्यासह लहान - मोठ्या २० जनावरांचा मृत्यू झाला.
तर, दोन शेतकरी जखमी झाले. पावसाने रब्बी पिकांसह डाळिंब, लिंबू, द्राक्ष, कांदे, मिरची, टरबूज, आंबा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
अकोला जिल्ह्यासह लगतच्या वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांत वादळी पावसाने गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे.
अकोला जिल्ह्यात पावसाने गहू, कांदा, संत्रा, आंबा, फळबागांचे मोठे नुकसान केले आहे. पातूर तालुक्यात पुन्हा गारपीट झाली. रविवारी (ता. ९) बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीटही झाली.
खामगाव, शेगाव तालुक्यांतील काही गावे व निमगावसह परिसरात या वादळाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. भुईमूग, कांदा, ज्वारी, गहू, मका पिकांचे प्रचंड नुकसान आहे.
खानदेशात सलग चार दिवस पाऊस व पीकहानी झाली आहे. काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस आणि हलकी गारपीटदेखील झाली असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वडेल (ता. धुळे) शेतशिवारात रविवारी गारांचा पाऊस सायंकाळी झाला. शेतातील गहू, हरभरा, मका, कांदा, दादर, रब्बी ज्वारीला फटका बसला असून, केळी व पपईचे झाडे उन्मळून पडली आहेत.
मुंगळा (जि. वाशीम) अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसामुळे मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरात आंबा, संत्रा फळबागा, भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले. काही बागांमध्ये संत्र्याची झाडे मुळासकट कोसळली.
पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शनिवारी (ता. ८) आणि रविवारी (ता. ९) अशा सलग दोन दिवसांत पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. आंबेगाव, खेड, इंदापूर, शिरूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे.
या पावसामुळे ज्वारी, बाजरी, गहू, भाजीपाला पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. कैऱ्यांसह मोहोर गळाल्याने आंबा पिकाला तडाखा बसला आहे. चास (ता. खेड) येथे वीज पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
पारस येथे सात भाविकांचा मृत्यू
बाळापूर (जि. अकोला) तालुक्यातील पारस येथे रविवारी (ता. ९) रात्री बाबूजी महाराज मंदिरात महाआरती सुरू असताना टिनशेडवर १०० वर्षे जुने कडुलिंबाचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे सात जणांचा मृत्यू झाला.
तर, २३ व्यक्ती जखमी झाल्या असून त्यापैकी पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. वादळामुळे हे झाड कोसळून त्याखाली ५० पेक्षा अधिक जण दबले होते.
सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
मध्य महाराष्ट्र : नांदगाव, येवला प्रत्येकी २०.
मराठवाडा : कन्नड ३०, सिल्लोड १०.
विदर्भ : मंगरूळपीर ३०, दारव्हा, करंजलाड, मनोरा प्रत्येकी २०, वाशीम, रिसोड, मालेगाव, दिग्रस, खामगाव, नेर प्रत्येकी १०.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.