
Satara News : जिल्ह्यात गारपीट होण्याचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (ता.१५) सांयकाळी माण, खटाव, खंडाळा तालुक्यांत काही ठिकाणी मोठी गारपीट (Hailstorm) झाली.
जिल्ह्याच्या इतर भागातही विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने कांदा, आंबा, कडबा भिजून मातीमोल झाला. या पावसाने फळ बागायतदार व कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आणले.
माणच्या पश्चिमेकडील भागात शनिवारी वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. बोथे व शिरवलीला मोठा गारांचा वर्षाव झाला. मलवडी, सत्रेवाडी व भांडवली यांना वळिवाने झोडपून काढले. गाडेवाडी या कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या वाडीत साधारण ४० एकर कांदा काढून ढीग रचून ठेवले होते.
मुसळधार पावसाने या ढिगांखालून पाणी वाहिले. त्यामुळे भिजलेले कांदे नासून मोठे नुकसान होणार आहे. शिंदी खुर्द, भांडवली, सत्रेवाडी या ठिकाणी लावलेल्या ऐरणी खालून पाणी वाहिले. त्यामुळे या ऐरणीतील कांदा सुद्धा नासण्याची शक्यता आहे.
खटाव तालुक्यातील पुसेगाव, बुध, रणसिंगवाडी, वेटणे, वेटणे ओढा, काटेवाडी परिसरात गारपिटीने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या वर्षी कांद्याला बाजारभाव नाही. त्यातच हा तडाखा बसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला गेला. काढणीस आलेल्या कांदा पिकाबरोबरच डिस्कळ परिसरातील चिकू, आंबा आदी फळबागांची मोठी हानी झाली.
खंडाळ्यात आंबा, कांद्याचे नुकसान
खंडाळा तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या असवली, कण्हेरी, जवळेसह परिसरातील गावांत आंब्यासह कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले. कोरेगाव तालुक्यातील जळगाव व खटाव तालुक्यातील शिरसवडीत वीज पडून नुकसान झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.