
Nashik News :जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांसह नुकसान (Crop Damage) वाढत आहे. त्यातच रविवारी(ता.३०) निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत, कोकणगाव परिसरात वादळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे कांदा, बेदाण्याचे मोठे नुकसान झाले.
निफाड व दिंडोरी तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष बागांमध्ये नुकसान मोठे आहे. बेदाणा खळ्यांवर वाळवला जात होता. मात्र पावसाने तो मातीमोल झाला आहे. मालेगाव तालुक्यात डाळिंबावर तेली रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर शेवगा, कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे.
येवला तालुक्यात उन्हाळ कांदे भिजले. बीजोत्पादन क्षेत्रातील डेंगळे खराब झाले. दिंडोरी तालुक्यातील तिसगाव परिसरात, सटाणा तालुक्याच्या उत्तर भागातील भूयाने परिसरात, देवळा तालुक्यात पाऊस झाला.
त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा झाकण्यासाठी रोज धावपळ करावी लागत आहे. मालेगाव तालुक्यात शेवग्याची फूलगळ होत आहे. बारीक शेंगा गळून पडत आहेत. त्यामुळे शेवग्याच्या बागेत झाडांखाली फुले, शेंगांचा सडा पडला आहे.
``परिस्थिती भयावह आहे. कांद्याला काढताही येईना, साठवता येईना. सगळ्यात जास्त कोंडी मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची आहे. बाप भीक मागू देईना, आई जेवायला देईना, अशी स्थिती आहे,`` असे वाखारी (ता. मालेगाव) येथील शेतकरी राजेंद्र मगर म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.