
Buldana News : जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने वादळी पाऊस हजेरी लावत आहे. विजांच्या कडकडासह गारपिटीमुळे (Hailstorm) पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
शनिवारी (ता.२९) मध्यरात्री मेहकर तालुक्यात देऊळगाव साकरशा भागात गारपिटीने फळबागांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे. तर रविवारी (ता.३०) सकाळी सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा जवळील राताळी येथे वीज कोसळून १४ शेळ्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात सातत्याने वादळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. शनिवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दाणादाण उडविली. बुलडाणा तालुक्यात बाणगंगा नदीला पूर आला. इतका पाऊस त्या नदीक्षेत्रात झाला. देऊळगाव साकरशामध्ये गायकवाड यांनी जिल्ह्यात सफरचंदाची लागवड करण्याचे धाडस केले होते.
त्यांच्या शेतातील या झाडांवर फळे लागली होती. या झाडांवरील सफरचंदाची फळे जमिनीवर आली. या आपत्तीमुळे गायकवाड यांचे प्रचंड नुकसान झाले. इतरही शेतकऱ्यांना या आपत्तीचा फटका बसला. दरम्यान रविवारी सकाळी सिंदखेडराजा तालुक्यातील राताळी येथे वीज कोसळून १४ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या.
सकाळी शशिकला तेजराव आव्हाळे व भिकाजी सखाराम जाधव हे शेळ्या चारत होते. त्यावेळी बाजूच्या लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. झाडाजवळ असलेल्या १४ शेळ्या या तडाख्यात दगावल्या. शेतीमालक जाधव व महिला ट्रॅक्टर ट्रॉली खाली आश्रयाला असल्याने बचावले.
सफरचंदाचे मोठे नुकसान
देऊळगाव साकरशामध्ये मध्यरात्री जोराचा वारा व सोबतच गारपीट झाली. यामुळे गणेश गायकवाड यांच्या फळबागेत लिंबू, आंबा, सफरचंदाचे प्रचंड नुकसान झाले. लिंबांचा झाडाखाली सडा पडला. काही दिवसातच काढणीला तयार होत असलेला आंबा जमिनीवर गळून पडला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.