
Pune News पुणे : जिल्ह्यातील हवेली, खेड, बारामती, दौंड, वेल्हे, इंदापूर, पुंरदर, भोर या तालुक्यांत झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकरी हवालदिल झाला आहे.
या तालुक्यांतील काही जणांचा काढणीला (Wheat Harvest) आलेला गहू, हरभरा बुधवारी (ता. १५), गुरुवारी (ता. १६) दोन दिवस झालेल्या पावसात भिजला. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.
रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणाने (Cloudy Weather) तरकारी पालेभाज्यांवरदेखील रोगांचे संक्रमण होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात चांगलाच बदल झाला असून गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक काळे ढग दाटून आले. त्यानंतर जोरदार पाऊस पडला.
काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजाच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा होता. त्यामुळे पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. हवेली, भोर, मावळ या तालुक्यांत सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस पडला.
हवेलीतील शिवाजीनगर ३.० मिलिमीटर, पाषाण २.५, हडपसर ३.५, चिंचवड ७.०, तर लवासा ३५.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर हवेलीतील सिंहगड, सांगरूण, आंबी, मालखेड, खानापूर, डोणजे, सोनापूर, खामगाव मावळ, गोऱ्हे, भोरमधील शिवगंगा परिसरात खेड शिवापूर, श्रीरामनगर, शिवापूर वाडा, आर्वी, रांजे, गाऊडदरा, कोढणपूर, कल्याण, आवसरवाडी, राहटवडे, वेल्हे तालुक्यातील निगडे, ओसाडे, रूळे, खामगाव या भागात चांगला पाऊस पडला.
बारामती तालुक्यातील झारगडवाडी, डोर्लेवाडी, सोनगांव, पिंपळी, मेखळी, गुणवडी, घाडगेवाडी, नीरावागज, सांगवी, खांडज, शिरवली, गावांतील अनेक शेतकरी तरकारी पालेभाज्या आणि द्राक्षाची पिके घेतात; मात्र अचानक हवामानात बदल झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची धास्ती निर्माण झाली आहे.
आणखी काही दिवस ढगाळ आणि पावसाळी वातावरण कायम राहिले तर पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.
दरम्यान, हवामानात बदलामुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण सून सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी काढणीला आलेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
अवकाळी पावसाने शेतीच्या कामामध्ये व्यत्यय आणला असून काही ठिकाणी मळणी सुरू असून शेतीमाल भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला. अवकाळी पावसाने बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे ताबडतोब कृषी विभागाकडून पंचनामे होणे गरजेचे आहे. कारण हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून जात असेल तर तो शेतकरी निराशेच्या गर्तेत जातो, अशावेळी त्याला सर्वांनी आधार देणे महत्त्वाचे असते.
- नारायण कोळेकर, शेतकरी, झारगडवाडी, बारामती,
त्वरित पंचनामे करावेत
डोळ्यांदेखत पिकांचे होणारे नुकसान पाहून अनेक शेतकरी अडचणीत येत आहे. गहू, हरभरा, कांदा, ऊस आदींसह इतर पिकांचे नुकसान झाले असून शासनाने त्वरित नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
पिके जमीनदोस्त
सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात उभी असलेली व काढणीस आलेली गव्हाची पिके तसेच घास पिके जमीनदोस्त झाली आहेत. सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा व मका ही पिके उभी आहेत. तर गहू, हरभरा या पिकांसह काही ठिकाणी कांदा पिकाची काढणी सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.