
जळगाव ः खानदेशात मागील दोन - तीन दिवसांत अनेक गावांमध्ये बेमोसमी पाऊस (Unseasonal Rain) झाला आहे. यात गहू (Wheat) , मका (Maize) , दादर ज्वारी (Jowar), भाजीपाला (Vegetable) पिकांची हानी (Crop Damage) झाली आहे.
हानी किती झाली आहे, याबाबत प्रशासनाने तातडीने पंचनामे (Crop Damage Survey) करून माहिती दिलेली नाही. तसेच अनेक गावांत पंचनामेही झालेले नाहीत.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये कृषी, महसूल विभागाबाबत प्रचंड नाराजी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा तालुक्यांत पावसाने हानी झाली आहे.
नवापुरातील विसरवाडी, खांडबारा भागाला रविवारी (ता.२९) पावसाने झोडपून काढले. त्यानंतर धुळ्यातील धुळे, साक्री भागातही पाऊस झाला. यात गहू आडवा झाला.
धुळे तालुक्यातील नेर, लामकानी व इतर भागांत ज्वारी, गहू पीक आडवे झाले आहे. परंतु याबाबत प्रशासन पंचनाने करण्यास हलायला तयार नाही.
कृषी विभाग व महसूल विभाग म्हणतो, नुकसान ३० टक्केही झालेले नाही. या आकडेवारीच्या खेळात शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात आले आहे.
यामुळे शेतकऱ्यांकडून मागणी असतानाही पंचनामे केलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढे नुकसान भरपाई मिळेल का, हा प्रश्न आहे. शेतकरी संकटात आहेत.
कापसाला दर नाही. त्यात रब्बी हंगाम उसनवारीने निधी आणून, उधारीची कीडनाशके, बियाणे, खते आणून उभा केला आहे. अशात शेतकऱ्यांना निधीची गरज आहे.
जळगाव जिल्ह्यात काही भागांत तुरळक पाऊस झाला आहे. कुठेही वादळ, पाऊस किंवा नुकसान झालेले नाही. परंतु ढगाळ वातावरणामुळे भाजीपाला, वेलवर्गीय पीकधारकांचे किडींच्या प्रकोपाने नुकसान झाले आहे.
पीकहाणी सुमारे एक हजार ते ११०० हेक्टरवरील पिकांचे धुळे व नंदुरबारात नुकसान झाले आहे. यात टक्केवारीची समस्या लक्षात न घेता कार्यवाही करावी व नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.