
Jalgaon News खानदेशात वादळ, गारपिटीने (Hailstorm) पीकहानी (Crop Damage ) सुरूच आहे. यातच बुधवारी (ता. २६) दुपारी व सायंकाळी जळगाव, धुळ्यातील अनेक भागांत गारपीट व वादळी पाऊस झाला. यात मका, केळी, बाजरी, ज्वारी आदी पिकांना मोठा फटका बसला.
बुधवारी जळगाव जिल्ह्यात जामनेर, बोदवड भागांत मोठी गारपीट व पाऊस झाला. जामनेरातील सोनाळे, पळसखेडा, जामनेर, पहूरलगतच्या भागातही पाऊस झाला. यामुळे केळी, मका, ज्वारीचे नुकसान झाले. धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत पाऊस झाला. सध्या बाजरी, ज्वारी, मका कापणी, मळणीची कामे सुरू आहेत.
पण पावसाने त्यात व्यत्यय आला. जामनेरात पळसखेडा, हिवरखेडा भागांत केळीचे नुकसान झाले. सुमारे दोन ते अडीच मिनिटे काही भागात गोटीच्या आकारांच्या गारा पडल्या. लिंबू पिकात फळगळ झाली. नुकसानीचे आकडे वाढत आहेत.
खानदेशात मार्चमध्ये ४ ते ७ मार्च, ९ ते १७ मार्च, ४ एप्रिल ते आतापर्यंत वादळी पाऊस, गारपीट अशी संकटांची मालिका सुरू आहे. मार्चमध्ये खानदेशात सुमारे ६३ हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली.
या महिन्यात गारपीट व वादळात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र जळगावात बाधित झाले. तर धुळ्यात दीड हजार आणि नंदुरबारात एक हजार हेक्टरला फटका बसला आहे.
प्रशासनाकडून पंचनाम्यांस टाळाटाळ
दरम्यान, पिकांच्या नुकसानीची टक्केवारी कमी-अधिक दाखविली जात असल्याने अनेक तलाठी पंचनामे टाळत आहेत. फक्त वारा होता, एक सेकंद गारा पडल्या, अशी बतावणी प्रशासनातील कृषी सहायक व तलाठी करीत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी पंचनाम्यांपासून वंचित आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.