
Nashik News : मागील सप्ताहात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने (Hailstorm) जिल्ह्यात हाहाकार झाला. त्याच्या वेदना ताजा असतानाच पुन्हा शनिवारी (ता. १५) पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपिटीने जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला.
त्यामुळे सिन्नर, दिंडोरी, सटाणा, मालेगाव, इगतपुरी, निफाड, नाशिक तालुक्यांत उरली-सुरली पिकेही हातची गेली. पिके हाती येण्याची आशा आता मावळली आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णता उद्ध्वस्त झाला आहे.
शनिवारी दुपारी सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वडगाव, भाटवाडी, हरसुले, सोनांबे, कोनांबे, डुबेरे, ठाणगाव, पाडळी, टेभुरवाडी आदी भागांत गारपिटीसह पावसाने अक्षरश: अर्धा ते पाऊण तास हाहाकार केला. रस्त्यांवर तसेच शेतात गारांचा ढीग साचला होता. यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. काढणीस आलेला गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, टरबूज, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले.
सटाणा तालुक्यात डांगसौंदाणे परिसराला पावसाने व गारांनी दुसऱ्यांदा झोडपले होते. याच भागात पुन्हा शनिवारी जोरदार पाऊस, गारपीट झाली. पिके उध्वस्त झाली. तरसाळी, औंदाने, वनोली, कौतिकपाडे, वीरगाव, डोंगरेज, ढोलबारे, चौगाव आणि परिसरात तब्बल दीड तास पाऊस कोसळला.
गाराही पडल्याने सर्वत्र गारांचा खच पडला. काढणी करून उपटून ठेवलेल्या उन्हाळी कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. यासह छाटलेल्या द्राक्ष बागा, डाळिंब, भाजीपाला, टरबूज या नगदी पिकांचेही मोठे नुकसान झाले. आंब्याचा मोहोर व लहान कैऱ्या गळून पडल्या आहेत. ताहाराबादसह मोसम, करंजाडी परिसरात कांदा, आंबे व इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
ब्राह्मणगाव, इजमाणे, बिजोरसे, अंबासन, मोराणे जवळपास पूर्ण नामपूर शिवारात कांदा झाकण्यासाठी तारांबळ उडाली. पश्चिम पट्ट्यातील तळवाडे दिगर, किकवारी, जोरण, मोरकुरे, भिलदर, कपालेश्वर आदी परिसरांत कांद्यासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
मालेगाव तालुक्यात झोडगेसह माळमाथा परिसरात कांदा, बाजरी पिकांचे नुकसान झाले. शेवग्याच्या फांद्या तुटून गेल्या. निफाड तालुक्यात पिंपळगाव, मुखेड, पाचोरेवणीसह गोदाकाठच्या शिवरे, सोनेवाडी खुर्द, निफाड, विंचूर, लासलगाव, नैताळे आदी भागांत द्राक्ष, भाजीपाला पिकांना फटका बसला.
निर्यातक्षम बागा नेस्तनाबूत
दिंडोरी तालुक्यातील पर्व भागातील मोहाडी, जानोरी, कुर्णोली, कोहाटे, चिंचखेड, दिंडोरी, मडकीजांब तसेच पश्चिम पट्ट्यात कांदा, गहू, हरभऱ्याचे, तर पूर्व भागात द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. गारपिटीच्या तडाख्यात जवळपास १५० एकरांहून अधिक क्षेत्रावर द्राक्ष बागा पूर्णतः नेस्तनाबूत झाल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसान दृष्टिक्षेपात...
- उन्हाळ कांदा भिजून नुकसान
- कांदा बीजोत्पादन क्षेत्र आडवे
- निर्यातक्षम द्राक्ष बागा मातीमोल
- भाजीपाला पिकांत टोमॅटो, हिरवी मिरची, वेलवर्गीय पिकांना तडाखा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.