
Crop Damage Yavatmal News गेल्या आठवड्यातील वादळी पावसाने भाजीपाला पिके उद्ध्वस्त (Vegetable Crop Damage) झाली आहेत. शेतात पाणी साचल्याने लाडखेड येथील शेकडो एकरांवरील कांदा, कोबीसह, पालक, तीळ आदी पिके पाण्यात गेली आहेत.
खरीप हंगामात अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन हे नगदी पिक गेले. त्यानंतर रब्बीत वादळी पावसाने गहू, हरभरा यांसह प्रमुख पिकांचे नुकसान केले. त्यानंतर आता उन्हाळी पिकांवरही वादळी पावसाने बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
एप्रिलमधील पावसाने जिल्ह्यातील पाच हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. मे महिना आला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही.
दारव्हा तालुक्यातील लाडखेड भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी फळे व भाजीपाला शेती मोठी आहे. मात्र यंदा वादळी पावसाने येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसाने शेतातील कांदा, तीळ, पत्ता कोबी, सांभार, पालक, टोमॅटो या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांद्याचे ढीग लावले होते. मात्र पावसाने कांदा पाण्यात गेला आहे. काही ठिकाणी कांदा वाफ्यामध्ये पाणी साचल्याने कांदा खराब झाला.
पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने पूर्ण पिके खराब झाली आहेत. नुकसानग्रस्तांना शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी भाजीपाला उत्पादकांनी केली आहे.
पंचनामे अजूनही अपूर्णच
एप्रिलमधील पावसाने जवळपास जिल्ह्यातील पाच हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी केली आहे. आतापर्यंत जवळपास १६०० हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात पंचनामे होणे बाकी आहेत. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.