
यवतमाळ ः गेल्या आठवडाभरात संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे (Yavatmal Rain) जिल्हाभरातील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी थेट शेतशिवारासह अनेक गावांत शिरले. त्यामुळे राळेगाव, मारेगाव, कळंब, बाभूळगाव, वणी या पाच तालुक्यांतील तीन हजार २३८ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. तर दीड लाख हेक्टर क्षेत्रातील पीक पाण्याखाली (Crop Damage) आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यंदाच्या हंगामात पाऊस जोरदार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. मात्र पावसाने सुरुवातीला दडी मारली. त्यामुळे ऐन पेरणीच्या वेळी शेतकरी चिंतेत सापडले. धूळपेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीची वेळ आली. बोंड अळीचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना उशिरा पेरणीचा सल्ला दिला. त्यासाठी उशिराच बियाणे विक्रीला सुरुवात करण्यात आली. जुलै महिन्यात सामान्य वाटणाऱ्या पावसाने पंधरवड्यात अतिशय रौद्ररूप धारण केले.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पूस, अरुणावती, बेंबळा, मध्यम अडाण, नवरगाव, गोकी, वाघाडी, सायखेडा, अधरपूस, बोरगाव आणि १०४ अशा एकूण ११४ प्रकल्पांतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. प्रकल्पातील जलसाठा वाढल्याने दरवाजे उघडून प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. प्रकल्पाचे पाणी शेतशिवारासह गावांतही शिरले. बघता बघता हजारो घरे पाण्याखाली आलीत. घरातील खते, किराणा, धान्य, पुस्तके आदी महत्त्वाच्या कागदपत्रांची नासाडी झाली.
जिवाच्या आकांताने नागरिकांनी घरातील साहित्य तसेच सोडून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांसह मजूरवर्गाच्या डोळ्यातही अश्रूंचा महापूर डाटला आहे. कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात एक लाख ५० हजार ८०५. ५३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पावसामुळे जिल्ह्यातील दोन हजार ८० घरांची पडझड झाली आहे. आतापर्यंत वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाला. तर एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. लहानमोठे अशा एकूण ३८ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय स्थलांतरितांची आकडेवारी
राळेगाव- १,०९०
मारेगाव- ४५
कळंब- ९१
बाभूळगाव- २१
वणी- १,९९१
दहा वर्षांतील प्रत्यक्ष पाऊस (मिलिमीटरमध्ये)
२०१३- १३६६.३६
२०१४- ७१५.१४
२०१५- ७०७.०७
२०१६- ९०३.१८
२०१७- ५६२.९३
२०१८- ७१२.०६
२०१९- ८६५.३४
२०२०- ८२९.८०
२०२१- ११६०.५
२०२२- ५४७.६ (५९.९०टक्के)
तालुकानिहाय पावसाची टक्केवारी
यवतमाळ तालुक्यात पावसाची टक्केवारी ५१.२९ आहे. बाभूळगाव तालुक्यात ५६.०२, कळंब तालुका ५४.५१, दारव्हा-६८.७०, दिग्रस-४९.९७, आर्णी-७५.९१, नेर -५२.४५, पुसद-४०.२०, उमरखेड ५२.१९, महागाव-६४.१३, वणी -७१.४०, मारेगाव-६४.६१, झरीजामणी-८६.००, केळापूर-६१.०३, घाटंजी-५१.३८, राळेगाव-६६.३५, अशी तालुकानिहाय पावसाची टक्केवारी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.