
जळगाव : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची (Jalyukt Shiwar Abhiyan) सुरुवात लवकरच होणार आहे. त्याबाबत राज्य शासनाने अध्यादेशाद्वारे गावांची निवड करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. यापूर्वीच्या अभियानात ‘सदस्य सचिव’ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी होते. आता राज्य शासनाने या अभियानाची धुरा सदस्य सचिव म्हणून ‘जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यां’कडे दिली आहे.
राज्यात पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता, पावसातील खंड यामुळे सततची पाणीटंचाईसदृश (Water Shortage) स्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. खंडित पर्जन्यमान, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हे अभियान २०१५-१६, ते २०१८-१९ दरम्यान राबविण्यात आले. याद्वारे लाखो लिटर पाण्याची बचत झाली.
यात अनेक गावे ‘पाणी’दार झाली. मात्र ही योजना राज्यातील सत्तांतरानंतर बंद झाली. आता भाजप-शिंदे सरकारने ही योजना पुन्हा सुरू केली आहे. राज्यभरातील सुमारे पाच हजार गावांत ही योजना राबविण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातील गावांची निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच होईल.
...अशी होईल गावांची निवड
या अभियानाचा पहिला टप्पा, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व आदर्श गाव इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत पूर्ण झालेली, कार्यान्वित असलेली गावे यातून वगळली जातील.
उर्वरित गावांपैकी अवर्षणप्रवण तालुक्यातील गावे, अपूर्ण पाणलोटाची गावे, ग्रामसभेच्या मान्यतेने, लोकसहभाग देणारी गावे, स्थानिक, जिल्हा समितीने शिफारस केलेली, पाण्याच्या ताळेबंदावर आधारित पात्र कामे यात घेता येतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.