
Pune Agriculture News : इंदापूर तालुक्यातील सणसर रायतेमळा या ठिकाणी नीरा डाव्या कालव्याला (Nira Canal) भगदाड पडून हा कालवा तीन वेळा फुटल्याने परिसरातील पिकांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतातील मातीदेखील वाहून गेली आहे.
याबाबत संबंधित विभागाने पंचनामे केले, परंतु अद्याप भरपाई न मिळाल्याने नुकसान झालेल्या पिकांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार, कोणत्या विभागाकडून मिळणार, याबाबत कोणीही ठोस माहिती देत नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.
सणसर रायतेमळा या ठिकाणी नीरा डाव्या कालव्याला तीन वेळा भगदाड पडल्याने ४५ शेतकऱ्यांचे ११ हेक्टर ३१ गुठ्यांवरील पिकांचे, तर ५ हेक्टर ३१ गुंठे शेतातील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच पाच शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे.
याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पंचनामे केले असल्याची माहिती तलाठी गोरख बारवकर यांनी दिली. सणसरचे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्यामराव भोसले, तलाठी गोरखा बारवकर, सणसर विभागाचे कृषी सहाय्यक मार्तंड देवडे, कोतवाल
मुकुंद चव्हाण यांनी नुकसानीचा पंचनामा केला. तसेच आमदार दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेटी देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.