
Akola News सध्या शेतीला वन्यजीवांपासून (Wild Animal Crop Damage) होणारे नुकसान हे एक मोठे संकट भेडसावत आहे. त्यामुळे वन्यजीव विरुद्ध शेतकरी हा संघर्ष कायम उभा राहत आहे.
या संघर्षावर उपाय म्हणून वन हद्दीत ‘कुरण विकास कार्यक्रम’ वन विभागाने (Forest Department) हातात घेतला आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ९० हेक्टर व दुसऱ्या टप्प्यात ८५ हेक्टरवर वन्य प्राण्यांचे खाद्य असलेले गवत लागवड करण्यात आली आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
या उपक्रमात पहिल्या टप्प्यात सन २०२२-२३ मध्ये बोरगाव (२० हेक्टर), बाभूळगाव (२५ हेक्टर), सोनखास (३० हेक्टर) तसेच बाभूळगावमध्येच अतिरिक्त १५ हेक्टर क्षेत्रात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतूनही कुरण विकास करण्यात आले आहे.
असे असून एकूण ९० हेक्टर क्षेत्रावर कुरणांचा विकास करण्यात आला. या कुरण विकास कार्यक्रमावर १ कोटी २० लाख रुपये खर्चही झाला. दुसऱ्या टप्प्यात पातुर (२० हेक्टर), सोनखास (३० हेक्टर), परांडा (३५ हेक्टर) अशी ८५ हेक्टरवर कुरण विकास कार्यक्रम राबविला जात आहे.
कुरण विकासात गवताचे बी पेरले जाते. त्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील मोकळ्या जमिनींची नांगरणी करून त्यावर सरी पद्धतीने गवत बी पेरण्यात येते. साधारण एक मीटर अंतरावर सरी पाडल्या जातात. काही वेळा गवताचे रोप तयार करूनही लागवड केली जाते. पाऊस पडण्याच्या आधीच हे काम केले जाते. या कालावधीत तेथे प्राण्यांचा वावर होऊ दिला जात नाही.
साहजिकच हे गवत वन्य प्राण्यांचा अन्नाचा शोध सुरू होतो तेव्हा त्यांना खाता येते. या जादाच्या वेळात तिकडे शेतांमधील पिके शेतकऱ्यांच्या हाती आलेली असतात आणि नुकसान टळलेले असते.
मारवेल, मोती तुरा, पौन्या, काळी मुसळी, जंगली हरळी, गोंडे गवत, राई गवत, सोंद्री गवत, लहान गवत, गोंधळ, तिखाडी, वैद्य गवत अशा प्रकारच्या लागवड करता येणाऱ्या गवताच्या जाती वापरल्या जात आहेत. ही सर्व गवते वन्य प्राणी आवडीने खातात.
वनविभाग लिलाव पद्धतीने लगतच्या ग्रामस्थांना ‘कापा आणि घेऊन जा’, या तत्त्वावर गवत नेण्यास परवानगी देतात, असे सहायक वनसंरक्षक सुरेश वडोदे यांनी सांगितले.
वन्यप्राणी हे जंगलात खाद्याचे दुर्भिक्ष झाले, की मानवी वस्त्यांकडे म्हणजेच शेताकडे जातात. त्यासाठी त्यांना दुर्भिक्ष कालावधीत पुरेसे खाद्यान्न उपलब्ध करणे हाच या कुरण विकासाचा उद्देश आहे. जेणेकरून ते शेताकडे जाणार नाही. जंगलांची घनता कमी होणे, जैविक ताणात वाढ, तापमानात होत असलेले बदल यासर्व पर्यावरणीय कारणांमुळे खाद्य गवत कमी होते. त्यासाठी कुरण विकास कार्यक्रम राबवून गवत लागवड व संवर्धन केले जात आहे.
-अर्जुना के. आर. उपवनसंरक्षक
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.