
पुणे : खेडमधील भोरगिरी, भिवेगाव आणि आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) भातखाचरांचे बांध फुटल्याने आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भातरोपांचे (Damage To Paddy Plant) व फुटलेल्या बांधांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई (Compensation To Farmer) द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी भातशेतीचे आगार म्हणून ओळखली जातात. भातशेती हेच या भागातील आदिवासी शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. आंबेगाव तालुक्यात पाच हजार १०० हेक्टर, तर खेडमध्ये ३ ते ४ हजार हेक्टरवर भात लागवड केली जाते. चालू वर्षी आदिवासी बांधवांनी रोहिणी व मृग नक्षत्रात काही ठिकाणी धुळवाफेत, तर काही ठिकाणी चिडवाफेत भाताच्या पेरण्या केल्या होत्या.
चालू वर्षी रोहिणी, मृग कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. परंतु, आर्द्रा नक्षत्रात पावसाने सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला होता. भातरोपे चांगल्या प्रकारे तरारून लागवडी योग्य झाली होती. लागवडी सुरू होताच या भागात मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे भातरोपे पाण्याखाली गाडून गेली. काही ठिकाणी भातखाचरांचे बांध फुटले आहेत.
आहुपे येथील सीताराम मोतीराम कुडेकर यांच्या भातखाचरांचा बांध फुटून मोठे नुकसान झाले. भात पीक हे आदिवासी भागातील मुख्य पीक असून दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्यामुळे आता पुढे वर्षभर काय करायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित राहिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.