
सिंधुदुर्गनगरी ः दोन महिन्यांनंतर जिल्ह्यातील वीजघर (ता. दोडामार्ग) गावात हत्ती (Elephant Rampage) पुन्हा दाखल झाले असून, रब्बी पिकांचे नुकसान (Rabi Crop Damage) करण्यास सुरुवात केली आहे. हत्तींच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील तिलारी परिसरातील अनेक गावांमध्ये हत्तींचा उपद्रव होतो. वीजघर, बाबर्डे, झोळंबे, तळकट, मार्ले, केर, हेवाळे आदी परिसरांतील अनेक गावांमध्ये हत्तींचा वावर असतो. या भागातील सर्वच फळपिकांचे हत्ती नुकसान करतात. याशिवाय बांबू, भातपीक, नाचणी आदी पिकाची देखील नासाडी करतात.
परंतु नोव्हेंबरपासून दोडामार्गात हत्तींचा वावर दिसून आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात भातपीक, नाचणी, चवळी, मूग, कुळीथ यांसह विविध कडधान्यांची लागवड केली होती.
परंतु रविवारी सायंकाळी वीजघर बांबर्डे परिसरात हत्तींचे दर्शन गावातील काही शेतकऱ्यांना झाले. या हत्तींनी गावात आगमन करताच शेतीचे नुकसान सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे
दरम्यान, ऑक्टोबर अखेरपासून लगतच्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील जंगलात हत्तींचा वावर होता. दरवर्षी या कालावधीत हे हत्ती तिलारी खोऱ्यातून या परिसरात जातात, त्यानंतर पुन्हा दोडामार्गात येतात.
आता लवकरच या भागात काजूबोंडू तयार होतील. याशिवाय फणसाच्या झाडांना देखील फळे पडण्यास सुरुवात होईल. त्यामुळे हत्तींचा कळप आता याच भागात स्थिरावेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होईल या शक्यतेने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.