
Kisan Long March नाशिक : वनजमिनींचा प्रलंबित प्रश्न, शेतीमालाला हमीभाव, दुधाचा प्रश्न, शेतीसाठी वीजपुरवठा, शेतीकर्जांची वसुली आदी विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीने माजी आमदार जे. पी. गावित (J. P. Gavit) यांच्या नेतृत्वात ‘लाँग मार्च’ची हाक देण्यात आली.
या आंदोलनात सहभागी झालेले मावडी (ता. दिंडोरी) येथील शेतकरी पुंडलिक अंबादास जाधव (वय ५८) यांचा शुक्रवारी (ता. १७) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
लाँग मार्चच्या माध्यमातून ठेवलेल्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य झाल्याचे सांगून मार्च थांबवण्याची मागणी केली; मात्र आंदोलक ठाम होते. याच दरम्यान, आंदोलनामध्ये सहभागी झालेले जाधव यांची प्रकृती अचानक खालावली.
उलट्यांचा त्रास होऊन अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शेतकरी ‘लाँग मार्च’ मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना अवाहन केले होते; मात्र यानंतरदेखील सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ‘लाँग मार्च’ मागे न घेण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती.
पालकमंत्री भुसे यांनी वाहिली श्रद्धांजली
‘लाँग मार्च’दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे दुःखद निधन झाले ते अतिशय दुःखद असून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, खरे म्हणजे असे निधन होणे हे मनाला चटका लावणारे असून या ‘लाँग मार्च’संदर्भात चार ते पाच बैठका घेतल्या.
नाशिक असेल, शहापूर असेल या ठिकाणी आपण बैठका घेतल्या. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित विभागांचे सचिव, तसेच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मॅरेथॉन बैठका घेत तोडगा काढला आणि शेतकऱ्यांना न्याय दिला, अशी माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.