
अमरावती : खरीप हंगामात (Kharif Season) झालेल्या अतिवृष्टी व संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्रातील (६२ टक्के) तूर बाधित झाली असून नुकसानभरपाई (Tur Crop Damage Compensation) मात्र अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ लागला आहे. नुकसानग्रस्त (Crop Damage) भागातील तुरीचे पंचनामे (Tur Crop Survey) करण्यात आल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
खरीप हंगामात सर्वांत उशिराने येणाऱ्या तूर (Tur) पिकाला हंगामातच नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.
सध्या तूर कापणी सुरू असून जिल्ह्यातील बहुतांश भागात तुरीच्या उत्पादनाची सरासरी घसरली आहे.
हंगामाच्या प्रारंभी अतिवृष्टी व संततधार पावसाने फटका दिल्यानंतर पीक सावरू शकलेले नाही. अनेक भागात तूर जळाल्यात. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे केले.
जिल्ह्यात तब्बल ७० हजार हेक्टर क्षेत्रातील तुरीचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.
यावर्षी १ लाख ११ हजार ६५८ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी होती. त्यापैकी ६२ टक्के क्षेत्रातील तूर उद्ध्वस्त झाली आहे.
कृषी विभागाने दिलेल्या संयुक्त अहवालानंतर राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत प्रति हेक्टर १३,६०० रुपये प्रमाणे नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली;
मात्र ही घोषणा कागदावरच आहे. अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा झाली नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईसाठी वारंवार विचारणा करण्यात येत असून कृषी अधिकाऱ्यांनाही त्यांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्न पडला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.