
नागपूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर (Maharashtra Karnataka Border Dispute) सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत हा सीमा भाग केंद्रशासित प्रदेश (onion Territory) जाहीर करावा असा ठराव विधान परिषदेने घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. विधानसभा व विधान परिषदेत एकमताने सीमा वादाबाबत असा ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारला राज्य सरकारने पाठवावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
विधान परिषदेत सोमवारी (ता. २६) उद्धव ठाकरे यांनी सीमा वादावर आपली भूमिका मांडली. या वेळी सीमा भागातील ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे अशा ग्रामपंचायतींना राज्य सरकार बरखास्त करणार का? असा सवालही त्यांनी केला. सीमा वादावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. अधिवेशन सोडून त्यांना दिल्लीत जाण्याची गरज काय? दिल्लीत गेले असले तरी सीमाप्रश्नी महाराष्ट्राला या घटनेचा काही फायदा होईल का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात सीमाप्रश्नी आम्ही लाठ्या खाल्ल्या आहेत. हे तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? मात्र सीमा वादावरून मराठी माणसाने आजही लाठ्या खायच्या का? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
सीमा प्रश्न लाठ्या खाल्ल्या म्हणून आज एकनाथ शिंदे गप्प आहेत का? एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सातत्याने महाराष्ट्र विरोधी भूमिका मांडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तोडून कर्नाटक विरोधात साधा ब्र शब्द देखील निघत नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली. बेळगाव, कारवार, निपाणी हा खरे तर कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला जोडण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे.
सीमावादावर कर्नाटकात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची एकजूट आहे. हे त्यापासून आपण काही बोध घेत महाराष्ट्र एकत्रित करण्यासाठी पुढे गेले पाहिजे. मात्र महाराष्ट्रात याउलट चित्र आहे. आपण राज्यात दुकानावर मराठी पाट्या बंधनकारक केल्या की त्याला आपल्याच लोकांकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले जाते हा विरोधाभास स्वीकारण्यासारखा नाही.
या वेळी उद्धव ठाकरेंनी सभागृहात एक पेन ड्राईव्ह सादर केला. त्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरील केस फॉर जस्टीस हा चित्रपट होता. हा चित्रपट सर्वांनी पहावा या चित्रपटात कर्नाटकातील मराठी भाषिकांवर कसे अत्याचार केले जातात हे दाखवले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
श्रेयवादाची घाई नको ः दरेकर
दरम्यान या मुद्द्यावर बोलताना सीमा वादावर श्रेय घेण्याची घाई करू नका. सत्ताधारी पक्ष विरोधात आहे असे खोटे रंगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीमा वादावर केंद्रात आणि महाराष्ट्र कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असताना का काही निर्णय झाला नाही? असे उत्तर भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत ठाकरे यांना दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.