सिंधुदुर्गनगरी ः खांडवी मासळी (Khandvi Fish) किनाऱ्याला येण्याच्या प्रमाणात झालेली घट, वातावरणात सतत होत असलेले बदल, पर्ससीन मच्छीमारांकडून होणारी घुसखोरी यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारा मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे मत्स्यदुष्काळ (Fish Drought) जाहीर करून पारंपरिक मच्छीमारांना (Fisherman) आर्थिक साह्य करावे, अशी मागणी १९ रापण संघांनी शासनाकडे केली आहे.
गेल्या काही वर्षांत परप्रांतीय नौका आणि एलईडीद्वारे मासेमारी सुरू आहे. या अवैध मासेमारीमुळे पारंपरिक पद्धतीने होणारी मासेमारी गेल्या तीन-चार वर्षांपासून अडचणीत आली. रापण पद्धतीने करण्यात येणाऱ्या मासेमारीला मोठा फटका बसला. शेकडो रापण व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. यापूर्वीच्या शासनाने काहीअंशी मदत केली. परंतु तरीदेखील पारंपरिक मच्छीमार आर्थिक खाईतून बाहेर आलेले नाहीत.
किनाऱ्याला मिळणारी खांडवी मासळी आता बंद झाल्यामुळे शासनाने मत्स्यदुष्काळ जाहीर करावा. पारंपरिक मच्छीमारांना आधार द्यावा, अशी मागणी देवगड तालुक्यातील १९ रापण संघांनी शासनाकडे निवेदनातून केली. हे निवेदन शुक्रवारी (ता.२५) मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्याकडे देण्यात आले. या वेळी रापण संघाचे पदाधिकारी चंद्रकांत घाडी, विश्वास भुजबळ, दादा सावंत, अशोक पेडणेकर, लक्ष्मण वाघट, सुरेश मुणगेकर यांनी दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.