
उजनी जि. लातूर : मागील वर्षी कारखान्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ऊस (Sugarcane Harvesting) घेऊन जाण्यास खूप उशीर झाला होता. मात्र उशीर होऊनही मागील हंगामात उसाचे वजन (Sugarcane Weight) समाधानकारक भरल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.
या वर्षी मात्र मागील वर्षीच्या उलट परिस्थिती आहे. यंदा कारखान्यांनी पुरेशी यंत्रणा उभी केली आहे. मात्र उसाच्या वजनात मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घट झाल्याने शेतकऱ्याचे यंदा मोठे नुकसान होत आहे.
यंदा खरिपातील सोयाबीनची उत्पादकता घटली असून, एकरी केवळ चार ते पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले आहे. उसाच्या बाबतीतही असेच काहीसे चित्र आहे.
एकरी ५० ते ६० टन उतार मिळालेल्या क्षेत्रात केवळ २५ ते ३० टन उत्पादन होत असल्याने खर्च देखील निघत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कायम असून शेतीत तोटा होण्याची परंपरा मात्र कायम आहे.
हरभरा पिकावर ही मर रोगाचा प्रादुर्भाव
सोयाबीन, ऊस पिकाच्या उत्पादनात घट झाल्यानंतर रब्बीतील प्रमुख हरभरा पिकाच्या उत्पादनावर शेतकरी अवलंबून आहेत. परंतु यावरही मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत असून यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
हक्काचा पीकविमा देखील मिळालेला नाही शेतकऱ्यांनी आपली पिके संरक्षित करावे जेणे करून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल असे प्रत्येक वर्षी कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना सांगितले जाते.
पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने खरिपातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच उसाच्या उत्पादनावरही याचा परिणाम झाला. या वर्षी सोयाबीनचे एकरी केवळ तीन ते चार क्विंटल उत्पादन मिळाले. तसेच साडेचार एकर मध्ये गेल्या वर्षी २८६ टन ऊस झाला होता. यंदा मात्र त्या ठिकाणी १३० टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. महागाईमुळे खर्चात वाढ झाली असून उत्पादनात मात्र घट झाली असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
- प्रशांत घोंगडे, शेतकरी, उजनी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.