
नारायणगाव, ता. जुन्नर ः रब्बी हंगामातील (Rabi Season) मशागतीची, पेरणीची (Rabi Sowing) व कांदा लागवडीची (Onion Cultivation) कामे सुरू असून, उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून (Dam) रब्बीचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे यांनी केली आहे.
कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात या वर्षी मुसळधार पाऊस झाल्याने कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे या पाच धरणांत शुक्रवार (ता. २) अखेर २८.१० टीएमसी (९४.६९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी प्रकल्पात २ डिसेंबरपर्यंत २३.८३ टीएमसी (८०.३२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता.
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रकल्पात ४.३७ टीएमसी(१४.३७ टक्के) जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील शेतजमीन हलक्या प्रतीची व मुरमाड असल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. यामुळे किमान डिंभे डावा कालव्यात रब्बीचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
१५ ऑक्टोबरपासून फेब्रुवारीअखेर रब्बी हंगाम असतो. कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप न झाल्याने रब्बी हंगामाचे नियोजन अद्याप झाले नाही. यामुळे कालव्यात आवर्तन सुरू करता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून पालकमंत्री पाटील यांनी तातडीने किमान डिंभे डावा कालव्यात पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत.
- गणपतराव फुलवडे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे
शक्रवारपर्यंत (ता.२) उपयुक्त साठा टीएमसी (कंसात टक्के) येडगाव: १.९२२ टीएमसी (९८.९२ टक्के), माणिकडोह : ९.२०६ टीएमसी (९०.४४ टक्के), वडज : १.१५४ टीएमसी (९८.४० टक्के), पिंपळगाव जोगे: ३.३६४ टीएमसी (८६.४७ टक्के), डिंभे : १२.४५३ टीएमसी (९९.६६ टक्के)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.