
Crop Damage in Solapur District : पाटकूल (ता. मोहोळ) शिवारातील उजनी डावा कालवा फुटून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यात एकूण १३९ शेतकऱ्यांचे १२० हेक्टर क्षेत्रातील फळबागा व इतर पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.
त्याची नक्की नुकसान भरपाईची रक्कम किती होते, त्यासाठी सर्व अहवाल कृषी विभागाकडे (Agriculture Department) दिला जाणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची भिस्त आता कृषी विभागावरच आहे.
यासंदर्भात तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२९ जानेवारी) पहाटे पाटकूल शिवारात उजनीचा डावा कालवा फुटला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध फळबागा व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार बेडसे यांनी पंचनाम्यासाठी कृषी पर्यवेक्षक, ग्रामसेवक व तलाठी यांचे संयुक्तिक पथके नेमली होती. त्यांनी रात्री उशिरापर्यंत थांबून पंचनाम्याचे काम पूर्ण केले.
पंचनाम्यानुसार एकूण १२० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात ४० हेक्टर फळबागा, ६० हेक्टर बागायती क्षेत्र, तर पाण्याच्या प्रवाहाने २० हेक्टर क्षेत्रातील माती खरडून गेली आहे.
दोन शेततळी वाहून गेली आहेत, तर १५ विहिरी गाळाने भरल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व ठिबक सिंचन संचही वाहून गेले आहेत.
नुकसान भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांचे सात-बाराचे उतारे काढण्याचे काम सुरू आहे. तसेच अनेक सात-बारा उतारे हे समाईक आहेत, त्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमेसाठी पुन्हा तक्रारी होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.