
परभणी ः ‘‘कृषी विद्यापीठांच्या संशोधनातून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन शक्य आहे. कृषी विद्यापीठांनी (Agriculture Universities) कमी कालवधीत येणारे विविध पिकांचे वाण (Crop Verities) तसेच उत्पादन खर्च (Agriculture Production Cost) कमी करणारे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवावे,’’ असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांनी शनिवारी (ता.२४) येथे केले.
सेवा हमी पंधरवडा मोहिमेअंतर्गत कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांना रब्बी बियाणे वितरण कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात करण्यात आले. कुलगुरू डॉ. इंद्र मणी, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, लातूर विभागीय कृषिसहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्हि. डी. लोखंडे, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर उपस्थित होते.
सत्तार म्हणाले, ‘‘कृषी विद्यापीठाच्या वाणांचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर द्यावे. शेतकऱ्यांच्या तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यासाठी वॉर रुम सुरु करण्याचे आदेश सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देणार आहोत. ‘एक दिवस बळिराजासाठी’ मोहिमेचा अहवाल कृषी धोरण ठरविण्यासाठी उपयुक्त ठरेल.
शेतकरी आत्महत्यांचा थांबविण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करत आहे. कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांतील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य दिले जात आहे. कृषी विद्यापीठाला येत्या मार्चपर्यंत ५० कोटी रुपये निधी दिला जाईल.’’
डॉ. मणी म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तसेच गरजेनुसार सेवा देण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ तत्पर आहेत.’’ या वेळी आंबेटाकळी (ता. परभणी) येथील १० मागासवर्गीय शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी, करडई बियाण्याचे वितरण करण्यात आले. महाडिबिटीअंतर्गंत ट्रॅक्टरचे वितरण शेतकऱ्यास करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.