
धामोड, जि. कोल्हापूर : गेल्या वीस वर्षांपासून रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल. प्रकल्पात पाणी साठवणूक करून परिसर सुजलाम् सुफलाम् होणार असून, धामणीवासीयांचे स्वप्न सत्यात उतरणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
राई (ता. राधानगरी) येथे प्रकल्पस्थळावर प्रलंबित कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आमदार आबिटकर यांनी या प्रकल्पाचा आढावा घेताना आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी व जिल्ह्यातील सर्वच आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पासाठी योगदान दिले असून, सरकार कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाही.
तसेच, ३४० कोटींचे टेंडर मंजूर झाल्याने प्रकल्पासाठीच्या पैशाचाही प्रश्न निर्माण होणार नाही, असे सांगितले. ते म्हणाले, की धामणी खोऱ्यास लागणारे एक टीएमसी पाणी सोडून उर्वरित पाणी हे लाभक्षेत्राबाहेरील क्षेत्रास खास बाब म्हणून उपसा सिंचन योजनेद्वारे दिले जाईल.
प्रकल्प पूर्णत्वाबरोबरच पुनर्वसनाचा प्रश्न पूर्णपणे सोडविला जाईल. त्यासाठी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास सर्वांनी आपापले योगदान द्यावे.
या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, ‘गोकुळ’चे संचालक अभिजित तायशेटे आदींनी मनोगते व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रकल्पग्रस्तांना भूखंड व जमीन वाटपाचे आदेश प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले.
या वेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर, उपस्थित होते. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अभियंता एस. एन. पाटील यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.