
रत्नागिरी : जिल्ह्यात आधारभूत भावाने भाताची खरेदी (Paddy Procurement) करणारी केंद्र सुरू झाली आहेत. भाताचा हमी भाव (Paddy MSP) चांगला असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात विक्री केंद्रावर भाताची विक्री करतो; मात्र, खरीप हंगामातील पिकांची केलेली ई-पीक पाहणी अहवाल ऑनलाइन पद्धतीने करताना अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंद न झाल्याने भाताची विक्री करण्यात अडचणी येत आहेत.
कोकणात पावसाळ्यात प्रामुख्याने भातशेती केली जाते. वर्षभरासाठी राखून ठेवल्यानंतर उर्वरित भाताची शेतकऱ्यांकडून विक्री केली जाते. शासनाने निर्धारित केलेल्या खरेदी-विक्री संघात हमी भाव पद्धतीने भाताची खरेदी करण्यासाठी ‘अ’ वर्गाच्या भाताला २०६० रुपये प्रति क्विंटल तर ‘ब’ वर्गाच्या भाताला २०४० रुपये दर निश्चित केला आहे.
त्यामुळे भाताची हमी भाव केंद्रावर विक्री करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत असून, त्यांना आधी आपल्या शेतीच्या सात-बारा उतारा, बँक पासबुक, जमिनीचा आठ-अ उतारा, आधारकार्ड यांची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक केले आहे; मात्र, ऑनलाइन पीक पाहणी करताना त्यावर क्षेत्राची नोंद सात-बारा उताऱ्यावर न झाल्याने शेतकऱ्यांना भात विक्री करताना हेलपाटे मारावे लागत आहेत.
भाताची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर सात-बारा उतारा न्यावा लागतो आणि त्या उताऱ्यावर २०२२ च्या पावसाळ्यात करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी अहवालाची नोंद नसल्यास भाताची खरेदी हमी भाव केंद्रावर केली जात नाही. अहवालाची नोंद शेतकऱ्यांच्या सात-बारावर होण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे ई-पीक पाहणी होऊनदेखील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील भातपिकाची नोंद उताऱ्यावर होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून सातत्याने समोर येत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.