
यवतमाळ : पीकविमा काढल्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीच्या मोबदल्यात विमा कंपनीकडून (Crop Insurance Company ) अल्पभरपाई देण्यात आली.
ही सरळ सरळ आर्थिक फसवणूक असल्याचा आरोप करीत वणी पंचायत समितीचे माजी सभापती जयसिंग गोहोकार यांनी थेट शिरपूर पोलिसांत तक्रार दिली आहे.
गेल्या खरीप हंगामात पावसाची संततधार होती. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली, तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
त्या पार्श्वभूमीवर संयुक्त समितीकडून पंचनामे व सर्व्हेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली. त्या आधारे राज्य शासनाने शेतकऱ्यांना भरपाईदेखील दिली. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाच्या भरपाईची रक्कम जमा झाली आहे.
असे असतानाही आम्ही सर्वेक्षण केले नाही असे सांगून विमा कंपनीकडून मात्र भरपाईस टाळाटाळ केली जात आहे. काही शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली. मात्र ती विमा हप्त्याच्या प्रमाणात फारच तोकडी आहे.
गोहोकार यांच्या तक्रारीनुसार, वणी उपविभागात सततच्या पावसासह अतिवृष्टी झाली. त्यामुळे पैनगंगा, वर्धा नदीसह नाल्यांना टप्प्याटप्प्याने चार वेळा महापूर आला. परिणामी, हजारो हेक्टरवरील कोवळी पिके नष्ट झाली.
याच दरम्यान वणी तालुक्यातील १४ हजार २५ शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस पिकाचा विमा उतरवला. त्यापैकी १३ हजार ५४४ शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रारी नोंदविल्या होत्या.
मात्र शासनाने ३१ डिसेंबरनंतर विमाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ५७०० रुपये कापूस, तर १७२१ रुपये सोयाबीन पिकाची प्रति हेक्टरी मदत जमा केली.
मात्र विम्याची ही रक्कम अवघी २५ टक्के आहे, की १०० टक्के याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करीत विमा कंपनीने केलेल्या फसवणुकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जयसिंग गोहोकार यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.