
गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गडहिंग्लज विभागातील कारखान्यांनी गतवर्षी कर्नाटकातील बारा हजार हेक्टरवरील ऊस (Sugarcane) आणला होता. तरीसुद्धा कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचेही त्यांनी गाळप (Sugarcane Crushing) केले आहे. यामुळे कर्नाटकातील उसामुळे स्थानिक ऊस शिल्लक राहिल्याचे चित्र नाही. यंदा मात्र संबंधित कारखान्यांनी कर्नाटकातून ऊस आणताना त्याच्यासोबत स्थानिक ऊस गाळपाचा रेशो ठरविण्याची सूचना प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. अशोक गाडे यांनी केली.
गडहिंग्लजमधील उसाचे गाळप प्राधान्याने करण्याच्या नियोजनासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार आज पालिकेच्या शाहू सभागृहात ही बैठक झाली. आजरा, संताजी घोरपडे, हेमरस, हमीदवाडा, इको-केन, अथर्व दौलत कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, ‘गोडसाखर कारखाना बंदमुळे गडहिंग्लजच्या उत्पादकांवर अन्याय होत आहे. वेळेत उसाची उचल होत नाही. उशिरा ऊस जाण्याने वजन घटत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी गडहिंग्लजचा ऊस प्राधान्याने गाळावा. अल्पभूधारक उत्पादकांची संख्या अधिक असून त्यांच्या ऊस तोडीला दहा हजारांवर खर्च येत आहे. एफआरपीत अपेक्षित वाढ नाही. उत्पादन खर्च वाढला आहे.’
गोडसाखरचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सर्व कारखान्यांनी कर्नाटकातील ऊस आणण्यावर नियंत्रण ठेवल्यास गडहिंग्लजच्या उत्पादकांचा ऊस वेळेत जाण्यास मदत होईल, असे सांगितले. राकेश पाटील यांनी कारखान्यांनी बसपाळीचा कालावधी कमी करण्याची सूचना मांडली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.